खटला दाखल केल्यानंतरही नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटेना
“एमपीसीबी’ महापालिकेला बजावणार पुन्हा नोटीस
पिंपरी – काही दिवसांपूर्वी रावेत बंधाऱ्यानजीक पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील नदी प्रदुषणाच्या मुद्दयावर यापूर्वीच महापालिकेविरूद्ध पुण्यातील न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. आता प्रदुषित पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पालिकेला पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. शहरात अनेकदा नदी प्रदुषणाने मासे मृत पावले आहेत. महापालिका कधी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविते तर कधी प्रदूषण नियंत्रण मंडळ पालिकेला नोटीस बजावते. भरीव काम होण्याऐवजी केवळ कागदी घोडे नाचविले जात असल्याचे दिसून येत आहे.
शहरासाठी नदीपात्रातून जलउपसा करून पिण्याचे पाणी उचलण्यात येणाऱ्या रावेत बंधाऱ्याजवळ मासे मृत पावण्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली. पवना नदीपात्रात केजुदेवी बंधारा येथे गेल्या वर्षी दोनदा मासे मृत पावण्याची घटना घडली होती. डिसेंबर-2019 मध्ये एमपीसीबीने या प्रकरणी तुमच्याविरूद्ध खटल्याचा प्रस्ताव दाखल का करू नये, अशा आशयाची नोटीस महापालिकेला बजावली होती. त्यानंतर महापालिकेने नदी प्रदूषण कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा कृती आराखडा एमपीसीबीला सादर केला होता. त्यानंतरही नदी प्रदुषणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी अपेक्षित उपाययोजना होत नसल्याने या प्रश्नाची व्यापकता वाढत चालली आहे.
रावेत बंधारा येथे भोंडवे लॉन्सजवळ पवना नदीच्या पात्रात नुकतेच मासे मृत होण्याची घटना घडली. घटनास्थळी भेट देऊन पवना नदीपात्रात सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी महापौर माई ढोरे यांनी केली. दरम्यान, मासे मृत झालेल्या ठिकाणी एमपीसीबीच्या वतीने पाहणी करण्यात आली आहे. तेथील पाण्याचे व मृत माशांचे नमुने घेण्यात आले आहे. पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागणार आहे. महापालिकेला या घटनेबाबत पत्र देऊन एमपीसीबीकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. तसेच, पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात येणार आहे.
शहरी सांडपाणी ठरतेय कारणीभूत
रावेत येथे पवना नदीपात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंटचा नालाही येथे नदीला मिसळत आहे. रावेत भागामध्ये उद्योगांकडून सांडपाणी सोडले गेले असल्याच्या तक्रारीचे “एमपीसीबी’च्या अधिकाऱ्यांनी खंडन केले. या भागात उद्योगांचे सांडपाणी मिसळलेले नाही. तर, सांडपाणी नलिकांचे योग्य जाळे महापालिकेने उभारले नसल्याने शहरातील सांडपाणी नदीपात्रात थेट मिसळत आहे. मासे मृत होण्याच्या घटनेला पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, हे प्रमुख कारण असल्याचे एमपीसीबीच्या अधिकाऱ्याने नमूद केले. केजुदेवी बंधारा येथेही यापूर्वी मासे मृत पावण्याची घटना घडलेली आहे.
जल प्रदूषणाचा गंभीर प्रश्न
शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नद्यांमध्ये होणाऱ्या जल प्रदुषणाचा प्रश्न सध्या गंभीर झाला आहे. सध्या सरासरी 32 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यामुळे नद्यांतील पाणी गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या शहरामध्ये दररोज 312 एमएलडी इतके सांडपाणी तयार होत आहे. त्यातील 280 एमएलडी सांडपाण्यावर महापालिका प्रक्रिया करीत आहे.
उर्वरित सांडपाणी मात्र प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळत आहे. नदीपात्रात थेट सोडण्यात येणारे सांडपाणी मैलाशुद्धीकरण केंद्रांकडे वळविणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने आवश्यक सांडपाणी नलिका टाकायला हव्या. सांडपाणी नलिकांचे शहरात पुरेसे जाळे उभारण्यात महापालिकेला अपयश आले आहे. पर्यायाने, जल पद्रुषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. “एमपीसीबी’कडून जल प्रदुषणाच्या मुद्दयावर मुख्य न्यायदंडाधिकारी (पुणे) यांच्या न्यायालयात ऑक्टोंबर महिन्यात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.