दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे. भगवान श्रीरामांनी या दिवशी अहंकाराने भरलेल्या लंकापती रावणाचा वध केला. दसऱ्याला म्हणजेच विजयादशमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला रामायणाशी संबंधित काही रहस्यांविषयी सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
असे म्हटले जाते की रामायण आणि भगवान राम यांच्याशी संबंधित अनेक चिन्हे आणि पुरावे आजही श्रीलंकेत आहेत. श्रीलंकेतील ठिकाणे आजही भगवान श्री राम आणि रावणाशी संबंधित अनेक सत्य सांगतात. नवरात्रीच्या समाप्तीनंतर दसरा साजरा केला जातो, याला विजयादशमी म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला होता.
एका संशोधनानुसार अशी जवळपास 50 ठिकाणे आहेत ज्यांच्याशी रामायणाचा संबंध आहे. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, श्रीलंकेतील एका टेकडीवरील गुहेत रावणाचा मृतदेह अजूनही सुरक्षित आहे. ही गुहा श्रीलंकेतील रैगला येथील घनदाट जंगलात आहे. असे मानले जाते की भगवान रामाने 10,000 वर्षांपूर्वी रावणाचा वध केला होता.
रावणाचा मृतदेह रागलाच्या जंगलात 8000 फूट उंचीवर असलेल्या गुहेत ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. रावणाचे पार्थिव ममी बनवून शवपेटीमध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यावर एक विशेष प्रकारचा लेप लावण्यात आला आहे, ज्यामुळे ते हजारो वर्षांपासून सारखेच दिसते.
श्रीलंकेच्या ‘इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटर’ने हे संशोधन केले आहे. या रिसर्चनुसार रावणाचे पार्थिव ज्या शवपेटीत ठेवले आहे ते 18 फूट लांब आणि 5 फूट रुंद आहे. असेही म्हटले जाते की या शवपेटीखाली रावणाचा अमूल्य खजिना आहे, ज्याचे रक्षण एक भयंकर नाग आणि अनेक भयानक प्राणी करतात.
असे मानले जाते की रावणाचा वध केल्यानंतर रामाने त्याचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी विभीषणाकडे सोपवला होता. पण सिंहासनावर बसण्याच्या घाईत असलेल्या विभीषणाला रावणाचा अंतिम संस्कार करता आला नाही आणि त्याने रावणाचा पार्थिव देह तसाच टाकून दिल्याची वदंता आहे.
इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनात रावणाची अशोक वाटिका कुठे होती आणि त्याचे पुष्पक विमान कुठे अवतरले होते, हेही शोधून काढल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय हनुमानाच्या पायाचे ठसे सापडल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र या सर्व गोष्टींची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही.