मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय राऊतांशी संबंधित अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई संजय राऊतांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून भाजप नेते नितेश राणे यंनी राऊत यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.
नितेश राणे यांनी ईडीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना तुरुंगात पाठवा, असे म्हटले आहे. राऊत यांना लवकर घोड्यावर बसवून तुरुंगात पाठवा. ज्याअर्थी ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे.
भ्रष्टाचार सिद्ध झाला असून संजय राऊत नावाच्या व्यक्तीने केला आहे. पैशाचा गैरवापर केला. त्यामुळे त्यांना बाहेर ठेऊन उपयोग नाही. त्यांना लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवले पाहिजे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
तत्पूर्वी राऊत म्हणाले की, अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं”, असंही राऊत यांनी म्हंटले आहे.