Ratnagiri ACB Raid : रत्नागिरी जिल्ह्यात लाचखोरीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सावर्डे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना विमा दावा मिळवण्यासाठी आवश्यक असलेले आरटीओ तपासणी अहवाल आणि डीएआर देण्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्रयस्त व्यक्तीमार्फत लाच स्वीकारताना सापळा मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे झालेल्या अपघातानंतर संबंधित कुटुंबीयांना विमा प्रक्रियेसाठी कागदपत्रांची गरज होती. ही कागदपत्रे देण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यापैकी १५ हजार रुपये त्रयस्त व्यक्तीमार्फत स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्या पथकाने सापळा रचून कांबळे यांना पकडले. या प्रकरणात अभिजीत शिर्के याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून सावर्डे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. माळशिरस पंचायत समितीतही लाचकांड दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस पंचायत समितीतही एसीबीने कारवाई केली. वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक (वय ५६) यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराने धर्मपुरी येथे सभा मंडपाचे काम पूर्ण करून त्याचे बिल सादर केले होते. काम पूर्ण झाल्याचा दाखला मिळवून देण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारीनंतर सापळा रचण्यात आला आणि तडजोडीनंतर ५ हजार रुपये स्वीकारताना नागटिळक यांना अटक करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांची पडताळणी स्वच्छ या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली; मात्र त्यांच्याविरुद्ध कोणताही गैरप्रकार आढळला नाही. पुढील गुन्हा नोंद प्रक्रिया सोलापूर येथील एसीबी कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे. दोन्ही घटनांमुळे शासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा लाचखोरीचा मुद्दा ऐरणीवर आला असून एसीबीच्या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.