तयार माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध : मात्र, अपेक्षित उठाव नाहीच
पुणे – खवय्यांचा लाडका असलेला फळाचा राजा आंब्याला यंदा अपेक्षित उठाव नाही. सध्या बाजारात रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, आंबा खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.
सध्या मार्केट यार्डात कर्नाटक हापूसची दररोज तब्बल 15 हजार पेट्या, तर 3 ते 4 हजार क्रेटची आवक झाली आहे. तर, रत्नागिरी आंब्याची 6 ते 7 हजार पेट्यांची आवक झाली आहे. दोन्ही आंब्यांची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटली असून गेल्या वर्षी कर्नाटक आंब्याची या हंगामामध्ये 30 ते 32 हजार पेट्यांची तर रत्नागिरीची 10 हजार पेट्यांची आवक होत होती. भावही स्वस्त झाले आहेत.
याविषयी रत्नागिरी आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, “सध्या तयार उच्च दर्जाचा आंबा बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. मात्र, त्यास अपेक्षित उठाव नाही. गेल्या वर्षी आंब्याची दुप्पट आवक होती आणि मागणीही भरपुर होती. परंतु, रत्नागिरी हापूसव्यतिरिक्त इतर आंब्याकडे ग्राहक वळल्याचे चित्र काहीसे निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारात रत्नागिरी हापूसचा डझनाला 200 ते 500 रुपये भाव मिळत आहे. 4 ते 8 डझनाला 1200 ते 2200 रुपये, तर 8 ते 10 डझनाच्या पेटीला 1500 ते 2600 रुपये भाव मिळत आहे.’
कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, “गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्नाटक हापूसकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तर, दुसऱ्या बाजूला लालबाग, मल्लिका, मलगोबा, बदाम या आंब्याला अधिक मागणी आहे. बाजारात आलेल्या कर्नाटक हापूसच्या डझनाला 200 ते 300 रुपये, पायरीला 200 ते 250 रुपये, लालबागच्या किलोला 30 ते 40 रुपये, तोतापुरीला 30 ते 40 रुपये मल्लिकाला 35 ते 40 रुपये, मलगोबाला 50 ते 60 रुपये, बदामला 40 ते 50 रुपये किलोला भाव मिळत आहे.’ गेल्यावर्षी दुपटीने आवक होत होती. परंतु, यावेळी पावसाचा परिणाम, उन्हाचा तडाखा याचा फटका कर्नाटक आंब्याला बसला असून कॅनिंगसाठी प्रमाणही वाढले आहे, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.