रत्नागिरी : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यातही रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता कोरोना योद्धा देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, याच कोरोना योद्ध्यांवर हल्ला झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे घडली आहे. पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर जवळपास 200 ते 250 जणांच्या जमावानं हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाला आहे.
साखरी नाटे या भागात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने सर्व्हेकरता गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी तेथील नागरिकांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलीस देखील तिथे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे, शिवाय, साऱ्या परिस्थितीचे गांभीर्य देखील सांगितले. पण, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी 200 ते 250 जणांच्या जमावाने थेट हल्ला चढवला.
यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले. गाडीची काच फुटली. तर, वैद्यकीय विभाग आणि पोलिसांचा एक कर्मचारी जखमी झाला. याप्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हा सारा प्रकार गंभीर असून घडल्या प्रकाराबद्दल जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया सध्या पुढे येत आहेत.