दुकाने चालू मात्र धान्य वाटप बंद
पिंपरी – रास्त भाव धान्य दुकानदारांच्या (रेशनिंग दुकानदार) विविध मागण्या राज्य सरकारने मंजूर न केल्याने त्याच्या विरोधात ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकीपर्स फेडरेशनने मंगळवारपासून (दि. 1) संप सुरू केला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील रेशनिंग दुकानदार सहभागी झाले आहेत. त्यांनी दुकाने चालू ठेवली आहेत. मात्र, धान्य वाटप बंद केले आहे. नागरिक सातत्याने धान्याबाबत विचारणा करण्यासाठी येत असल्याने काही दुकानदारांनी दुकानेच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकीपर्स फेडरेशनच्या वतीने राज्य सरकारकडे वारंवार केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात 1 सप्टेंबर पासून राज्यातील सर्व रास्त भाव रेशनिंग दुकानदारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत फेडरेशनतर्फे अध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर यांनी भूमिका स्पष्ट केली होती. रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण, सुरक्षा साधने, आरोग्य तपासणी, रेशनिंग दुकानदारांनी वितरित केलेल्या धान्यासाठी निश्चित केलेले कमीशन तसेच रेशनिंग दुकानदारांनी स्वतःचे आधार अधिप्रमाणित करून वितरण करण्याची मुभा द्यावी, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी एप्रिल 2020 पासून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
राज्यात आणि पिंपरी-चिंचवड शहरात करोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत रास्तभाव धान्य दुकानदार यांचा नागरिकांशी संपर्क वाढत आहे. त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी विमा संरक्षण देणे हे अनिवार्य आहे. मात्र, राज्य शासनाने याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. रेशनिंग दुकानदारांनी एपीएल केशरी कार्डधारकांना धान्य वितरित केले. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच दीडशे रुपये कमीशन द्यावे, अशी रेशनिंग दुकानदारांची मागणी आहे. रास्त भाव धान्य दुकानदारांच्या मागण्या मान्य केल्यानंतरच हा संप मागे घेतला जाईल, अशी भूमिका ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशनने घेतली आहे.
रेशनिंग दुकानदारांनी विमा संरक्षण व अन्य प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राज्य सरकारशी गेल्या तीन महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरू होता. मात्र, सरकारने त्याची दखल न घेतल्याने हे पाऊल उचलावे लागले. दुकाने सुरू मात्र धान्य वाटप बंद, अशा पद्धतीने संप सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्यात येणार आहे.
– गजानन बाबर, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन.
करोनाच्या संकट काळात धान्य वाटपाचे काम करणाऱ्या दुकानदारांना विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे. धान्य वाटपासाठी कार्डधारकांच्या अंगठ्याचा ठसा न घेता दुकानदारांच्या अंगठ्याचा ठसा घ्यायला हवा. न्यायालयाने राज्य सरकारला रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिल्यानंतरही सरकारने निर्णय न घेतल्याने हा संप सुरू केला आहे.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकीपर्स फेडरेशन.