नगर – गरिबाला स्वस्तात धान्य मिळावे यासाठी शासनाकडून स्वस्तधान्य योजना राबविली जाते. आता वन नेशन वन रेशन अभियानांतर्गत देशातील 32 राज्यांमध्ये लाभार्थी कोणत्याही स्वस्तधान्य दुकानातून धान्य घेऊ शकतो. त्यासाठी केवळ रेशन कार्डला आधार कार्ड लिंक असणे अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
महाराष्ट्रात बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आदी राज्यांतून मजूर स्थलांतरित होतात. तर, राज्यातही मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक रोजगाराच्या शोधासाठी जातात. या लोकांना जास्त किमत मोजून धान्य खरेदी करावे लागते. तर, रेशन कार्ड असून दुसऱ्या राज्यात, जिल्ह्यात रेशन कार्ड घेत येत नाही. त्यामुळे स्थलांतरित नागरिकांची कुचंबणा होत होती. त्यांना स्वत:च्या रेशन कार्डवर देशात कोठेही धान्य मिळण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या एक जानेवारी 2021 पासून वन नेशन वन रेशन अभियान सुरू केले. रेशनकार्डला आधारकार्ड लिंक असणे किंवा रेशन कार्डचा क्रमांक जवळ असल्यास प्रत्येक लाभार्थ्यांना देशात कोठेही धान्य मिळणार आहे.
32 राज्यांत योजना सुरू
देशातील 32 राज्यात वन नेशन वन रेशन अभियान सुरू आहे. केवळ पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड, दिल्ली या राज्यात ही योजना लागू नाही. अन्य राज्यात सर्व सुरू आहे. केंद्र सरकार रेल्वेच्या माध्यमातून योजनेची जनजागृती येत आहे. स्थानिक पातळीवर भिंत्तीपत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
मेरा राशन ऍप
शासनाने मेरा राशन नावाने नवीन ऍप तयार केले आहे. ते ऍप मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यास त्यावर रेशन कार्डवरील लाभार्थी व त्यांना मिळणाऱ्या धान्याचा तपशील कळणार आहे. कुटुंबातील सदस्यांची माहिती मिळणार असून, त्यानुसार धान्य मिळते की नाही हे समजणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची नावे पाहून घेता येतील.
दुकानदारांची मनमानी संपणार
वन नेशन वन रेशन अभियानामुळे दुकानदारांची मनमानी संपणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या धान्याचा तपशील कळणार आहे. त्यामुळे धान्य आले नाही. पुढच्या महिन्यात येईल, अशी दुकानदारांची उत्तरे बंद होणार आहेत. या अभियानामध्ये दुकानदारांना मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येणार आहे. जास्त लाभार्थ्यांची नोंदणी झाल्यास तितकाच धान्य पुरवठा होणार आहे.
ऊसतोड मजुरांची सोय
बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी आदी जिल्ह्यांसह विदर्भ व मराठवाड्यातील मजूर ऊसतोडणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जातात. त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. ते ज्या जिल्ह्यात जातील तिथे त्यांना रेशनवरील धान्य मिळणार आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 8 हजार 285 नागरिकांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे.