पिंपरी – ‘वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी नोकरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार’ अशा बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, यामध्ये तथ्य नाही.
तर केसरी किंवा लाभार्थी रेशनकार्ड असणारे व यापैकी ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्यावर आहे त्यांचे कार्ड श्वेत होणार आहे. याचाच अर्थ कार्डामार्फत मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार नसल्याने त्यांचे धान्य बंद होईल, अशी माहिती रेशनिंग व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. दि. 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल अशी तीन महिने ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत प्रत्येक रेशनकार्डची तपासणी होणार आहे.
कार्डधारकांकडून विहीत नमुन्यातील अर्ज भरून घेतला जाणार आहे. या अर्जासोबत संबंधित कार्डधारकाला रहिवासी.पुरावा जोडावा लागणार आहे. हा पुरावा एका वर्षातील असणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची छाननी होणार आहे.
अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम दि. 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. कार्ड तपासणी प्रक्रिया सुरू असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.