नवी दिल्ली – जगन्नाथ पुरीतील रथयात्रेची धामधूम सुरू असतानाच धक्का बुक्की झाल्याची घटना समोर येत आहे. पुरी रथयात्रेत बलभद्र ताल रथ ओढत असताना मार्चीकोट चौकात धक्काबुक्की झाल्यामुळे गोंधळ उडाला होता. यामुळे 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना पुरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुरीमध्ये रथ ओढत असताना भाविकांमध्ये धक्का बुक्की झाली. यामुळे काही लोक खाली पडले यामुळे चेंगराचेंगरी झाली. जखमींना पुरीच्या सदर मुख्यालयात दाखल करण्यात आले आहे. मरीचिकोट चौकात ही घटना घडली.महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने पडल्यानंतर तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. पडलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एका विदेशी भाविक नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते.
महाप्रभूंची जगप्रसिद्ध रथयात्रा पाहण्यासाठी लाखो भाविक पुरीत जमले आहेत. जगन्नाथ धामच्या रथयात्रेत 10 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. अशा परिस्थितीत भाविकांना उष्मा आणि आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी त्यांच्यावर कारंज्यातून पाणी शिंपडले जात आहे.
#WATCH | Odisha | People gather in large numbers in Puri to witness and take part in #JagannathRathYatra 2023. pic.twitter.com/dJxBNVp3ON
— ANI (@ANI) June 20, 2023
पुरी जगन्नाथ धाम येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पुरी शहर आणि परिसरात 180 प्लाटून पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बारदंडच्या दोन्ही बाजूंच्या घरांवर स्नॅपर तैनात करण्यात आले आहेत. पुरी जगन्नाथ धाममध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची झडती घेऊन सोडण्यात येत आहे.