मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हिंदू मुलींचे होणारे धर्मांतर याविषयीचा मुद्दा मांडला. याविषयी बोलताना हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिले जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना “महाराष्ट्रासाठी हा फार गंभीर प्रश्न आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवलं जातं. मुलीवर अत्याचार करत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच आरोपीला पकडलं जात नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला स्थानिक जेलमध्ये बंद केलं आहे. सेंट्रल जेलमध्ये पाठवलेलं नाही,” असे नितेश राणे म्हणाले.
“सानप नावाच्या अधिकाऱ्याचे आरोपीसोबत आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा आहे. आरोपीला घरचं जेवण दिलं जात असून, इतर मदतही केली जात आहे. हा महाराष्ट्रासाठी गंभीर विषय आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना फसवलं जातं आणि त्यासाठी त्यांना ताकद दिली जाते,” असा आरोप नितेश राणेंनी केला.
पुढे ते म्हणाले “हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी पैसे दिले जातात, बाईक दिली जाते. धर्मपरिवर्तनाला बळ देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड करण्यात आलं आहे. शीख तरुणीला फसवलं तर सात लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर सहा लाख, गुजरातील ब्राह्मण तरुणीसाठी सहा लाख, ब्राह्मण तरुणीसाठी पाच लाख, क्षयित्र तरुणीसाठी चार लाख असं रेट कार्ड आहे. तरुणींना विकण्यापर्यंत यांची मजल जात आहे. धर्म परिवर्तनाच्या नावाखाली मुलींचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे”.
आरोपींसोबत संबंध असणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले जावे अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी केली. महाराष्ट्रात या घटना वाढत असून उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरातप्रमाणे धर्मांतरविरोधी कायदा लागू कऱणार का? अशी विचारणाही नितेश राणे यांनी यावेळी केली.