टाकळीभान – आदिवासी समाजाला उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन नसल्याने टाकळीभान टेलटॅंकमध्ये मासेमारी करण्यासाठी दिलेला ठेका रद्द करुन तो परिसरातील आदिवासी भिल्ल समाजाच्या नोंदणीकृत अशोक मच्छीमार सोसायटीलाच प्राधान्याने देण्यात यावा. अन्यथा एकलव्य भिल्ल समाज संघटना उपोषणाचा मार्ग स्वीकारेल, असा इशारा एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रांताध्यक्ष शिवाजी गांगुर्डे यांनी श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर टाकळीभान बसस्थानक परिसरात आयोजित केलेल्या रास्तारोको प्रसंगी बोलताना केले.
टाकळीभान टेलटॅंकचा मासेमारीचा दिलेला ठेका रद्द करावा, आदिवासी समाजाला वाटप करण्यात आलेल्या जमिनी शर्त भंग झाल्याने सरकार जमा झाल्या आहेत. त्या पुन्हा आदिवासींच्या नावे करण्यात याव्यात, माजी होमगार्डना पेंशन मिळावी या प्रमुख मागण्यासाठी टाकळीभान येथे श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर बसस्थानक परिसरात रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
गृहरक्षक दल संघटनेचे हरीशचंद्र पवार, दिलीप गोलवड यांनीही आदिवासी व माजी गृहरक्षक दलाच्या जवानांच्या समस्या मांडून शासनाच्या कामचलावू धोरणामुळे समाजाला रस्त्यावर येण्याची वेळ आली असल्याचे सांगून समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी केली.
यावेळी सुमारे पाऊण तास रस्त्यावर आदिवासी समाजाच्या महिला, पुरुषांनी ठाण मांडले होते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
शेवटी 11.45 वाजता नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ, गाव कामगार तलाठी अरुण हिवाळे व तालुका पोलीस ठाण्याचे स.फौ. नितिन शिंदे यांनी निवेदन स्विकारल्यानंतर आंदोलन संपविण्यात आले. यावेळी अशोकचे संचालक बापुराव त्रिभुवन, टाकळीभानचे उपसरपंच पाराजी पटारे, ग्रा.प.सदस्य अप्पा रणनवरे यांनी आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पवार, महिला आघाडीच्या अंजली पवार, नेवासा तालुकाध्यक्ष सुरेश बर्डे, ज्ञानेश्वर माळी, आकाश माळी, अरविंद माळी, रविंद्र मोरे, झिरा गांगुर्डे, बाळासाहेब रणनवरे, माजी गृहरक्षक दलाचे पटारे, सापते, शिंदे आदींसह आदिवासी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.