मांजरी- पुणे- सोलापूर महामार्गावर मांजरी बुद्रुक येथील उपबाजारासमोर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. याविरोधात रविवारी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी रास्तारोको आंदोलन केले. काही राजकीय लोक या महामार्गावरील अनाधिकृत भाजीविक्रीला पाठबळ देत असून, त्याकडे पोलीसही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केला आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1306490103024025/
पुणे-सोलापूर महामार्गावर रस्ता अडवून सुरू असलेली अनाधिकृत भाजीविक्री त्वरीत बंद करावी, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचा मांजरीतील कै. अण्णासाहेब मगर उपबाजार हा पूर्ण वेळ सुरू ठेवावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. मात्र त्याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. पोलीस अधिकारी हमराज कुंभार यांनी मागणीचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
माजी आमदार योगेश टिळेकर, सरपंच शिवराज घुले, सदस्य समीर घुले, सीमा घुले, नयना बहिरट, शैलेंद्र बेल्हेकर, बबन जगताप, बाळासाहेब घुले, गणेश गायकवाड, सत्यवान घुले यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
सरपंच शिवराज घुले म्हणाले, “मांजरी उपबाजार फक्त 5 तासांसाठी सुरू असल्याने हे व्यापारी महामार्गाच्या दोन्ही बाजूला भाजीविक्री करतात. 6 पैकी 4 लेन पूर्ण वाहने लावून बंद करत आहेत. हे व्यापारी स्थानिक सोसायटी रहिवाशांना शिवीगाळ, मारहाण, मोटारसायकलींचे नुकसान करत असून काहींना जीवे मारण्याची धमकीसुद्धा देत आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी व व्यापारी मास्क लावत नाही व सामाजिक अंतर पाळत नाहीत. मांजरी हे 1 लाख लोकसंख्येचे गाव असून आतापर्यंत 743 इतके करोना बाधित सापडलेले आहेत. 12 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. हे व्यापारी काळजी न घेतल्यामुळे या आजारची मांजरी परिसरामध्ये करोना वाढण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाला कळवूनही दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. रस्त्यावरील बाजार बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.’
माजी आमदार तथा भाजप ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले, ‘महामार्गवर जीव धोक्यात घालून अनधिकृत भाजविक्री केली जात आहे. यासाठी व्यापाऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे हे लोक दादागिरी करत आहेत. केवळ राजकीय अनास्था व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने महामार्गावर अनधिकृतपणे भाजीविक्रेते बसत आहेत. यातून मोठ्या अपघाताची भीती आहे. करोना संकट अजून संपले नसून शेतकरी आणि व्यापारी यांनी स्वतःहून हा अनधिकृत बाजार बंद करावा,’