राजकारणात असले तरी शरद पवार हे साहित्यिक, कलावंत यांच्यात रमतात. त्यांना योग्य तो सन्मान देतात. त्याचेच सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांनी उभारलेल्या “आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर’ सभागृहाच्या उद्घाटन समारंभात केलेले भाषण होय.
नाना असोत भाषा माझा विरोध नाही
प्रीतीस कोणतीही भाषा अबोध नाही
जो सत्विचार तो तो मज लक्षणीय आहे
मी भारतीय आहे
या गदिमांच्या काव्यपक्तींनी आपल्या भाषणाची सांगता केली. बारामतीतील साने गुरूजी कथामालेच्या संयोजनात शरद पवार सक्रिय सहभागी होत. वर्ष 1967 मध्ये या कथामालेच्या रौप्यमहोत्सवी वर्षासाठी पुण्यातून गदिमा आणि पुलंना नेण्याची जबाबदारी पवार यांच्यावर होती. पवार यांच्या एका बागायतदार मित्राला गाडी देण्याची पवार यांनी विनंती केली. तेव्हा मोटार घेऊन हा मित्र जातीने हजर. गाडीत बसल्यावर त्यानं विचारले पाव्हणं कुठलं? पवार यांनी सांगितले, पाव्हणं पुण्याचं! पुढचा प्रश्न काय करतात? गदिमांनी उत्तर दिलं आम्ही लिवतो. लगेच पुन्हा प्रश्न काय लिवता? पु.लं. म्हणाले, मी पोस्टाबाहेर लिवतो आणि हे कोर्टाबाहेर लिवत्यात… पवार यांच्यात असणारा
मिश्किलपणा हा अशा सहवासातून आला असावा. पी. सावळाराम यांना टाण्याच्या नगराध्यक्ष बनवण्यात शरद पवार यांचा वाटा सर्वश्रुत आहेच. गदिमा, पुलं, व्यंकटेश माडगूळकरांपासून ते रामदास फुटाणे याच्यापर्यंत अनेक साहित्यिकांचा त्यांनी गौरव केला. त्यांच्याशी मैत्र जोडले. महानोर आणि लक्ष्मण माने यांना त्यांनी विधान परिषदेवर जाण्याची संधीही दिली.
साहित्यिकांसोबत पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके यांच्याशी त्यांचा उत्तम स्नेह होता. नक्षत्रांचे देणे या बाबुजींवरील कार्यक्रमाला म्हणूनच त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. लतादीदींना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत मालिनी राजूरकर यांची मैफल म्हणून आयोजित केली.
सांस्कृतिक क्षेत्रात केवळ रसिक म्हणून नव्हे; तर नव्या कलाकारांना संधी देण्यासही पवार यांनी मदत केली आहे. पुणे विद्यापीठाच्या ललीत कला केंद्रात 10 विद्यार्थ्यांच्या शुल्काची व्यवस्था विद्या प्रतिष्ठानमार्फत करण्यात आली आहे. या शुल्कातून अनेकांची कारकिर्द घडली आहे.
अभिनेते नाना पाटेकरसारख्यांशी पवार यांचा स्नेहधागा सहज जुळतो आणि वर्षानुवर्षे जपलाही जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक मतभेद होते. पक्षीय राजकारणात टोकाचे विरोधक होते. पण तरीही त्यांचे मैत्र अतूट होते.
शिवसेनाप्रमुखांसह त्यांनी एक मासिक काढले होते. पण ते काही चालू शकले नाही. त्या मासिकाचा पहिला अंक सिद्धीविनायकाला वाहा म्हणजे मागे वळून पहावे लागणार नाही, असा सल्ला बाळासाहेबांना एका ज्योतिषाने दिला होता. त्यानुसार सिद्धीविनायकाला अंक अर्पण केला. पण दुसरा अंक काही निघाला नाही. त्यानंतर बाळासाहेबांनी त्या ज्योतिषाचे काय केले असेल ते वेगळे सांगायला नको, हा किस्सा स्वतः पवार यांनी राज ठाकरे यांच्या बाळासाहेबांच्या जीवनावरील चित्रचरित्राच्या प्रकाशन समारंभात सांगितला होता.
जागतिक मराठी अकादमीच्या उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. याशिवाय या अकादमीचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर करू नये, असा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.
याशिवाय, किमान सातपेक्षा अधिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे उद्घाटक शरद पवार यांनी एक अनोखा विक्रमही केला आहे. समस्त विचारसरणीच्या साहित्यिकांना पवार आपलेच वाटतात, हीसुद्धा पवारांची अनोखी ओळख म्हणायला हवी.
म्हणून राजकारण करतानाही सांस्कृतिक क्षेत्रही विकसित व्हावे यासाठी आग्रही असणाऱ्या या नेत्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.