नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हरिद्वारमध्ये 5 दिवसीय चिंतन शिबिर सुरू झाले आहे. भाजपच्या 4 राज्यांतील विजयाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या शिबिराविषयी मोठी उत्सुकता आहे. संघाची ही परिषद दक्षिण व उत्तर भारतात स्वतंत्रपणे सुरू आहे. त्यात प्रामुख्याने 5 मुद्यांवर चर्चा सुरू आहे. त्यात 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसह संघाच्या 2025 च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा अजेंडा आघाडीवर आहे.
संघाच्या बैठकीत उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश व पश्चिम बंगाल या 4 राज्यांचे भाजप सरचिटणीस बदलण्याच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यूपीचे भाजप सरचिटणीस 2014 पासून आपल्या पदावर आहेत. आता 9 वर्षांनंतर त्यांना बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय, पश्चिम बंगालच्या सरचिटणीसांवरही या बैठकीत उहापोह होत आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर तृणमूल कॉंग्रेसशी हातमिळवणी झाल्याचे आरोप झाले होते. याची तक्रार संघ व भाजपच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती.
हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. त्यामुळे तेथील सरचिटणीस पवन राणा यांचाही पदभार काढला जाईल असा अंदाज आहे. तर राजस्थानच्या सरचिटणीसांचे कार्यक्षेत्र बदलले जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गत महिन्यातच मध्य प्रदेशातील भाजप सरचिटणीसांची उचलबांगडी करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, संघाच्या हरिद्वारमधील बैठकीत या प्रकरणी विस्तृत चर्चा होऊन एखादा ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
बिहार, झारखंड, गुजरात व मध्य प्रदेशाच्या भाजप सरचिटणीसांचे कार्यक्षेत्र गतवर्षीही बदलण्यात आले होते. गत ऑगस्ट महिन्यात भाजपने बिहारच्या पंचायत निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू भीकूभाई दलसानिया यांची बिहारच्या भाजप संघटन महामंत्रीपदी नियुक्ती केली होती. तत्पूर्वी, नागेंद्र नाथ या पदावर होते. दलसानिया यांनी गुजरातमध्ये भाजपला बळकटी प्रदान करण्यासाठी मोठे कष्ट घेतले होते.
गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभेचा फड रंगणार आहे. त्यामुळे भाजपने रत्नाकर यांच्याकडे सरचिटणीसपदाची धूरा सोपवली आहे. रत्नाकर आतापर्यंत बिहारमध्ये सह संघटन महामंत्री होते. तत्पूर्वी, 17 मार्च रोजी भाजपने हितानंद शर्मा यांची मध्य प्रदेशच्या पक्ष सरचिटणीसपदी नियुक्ती केली होती. त्यांनी सुहास भगत यांची जागा घेतली होती. भगत यांना संघात परत बोलावण्यात आले आहे.