मुंबई -फोन टॅपिंगप्रकरणी सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले होते. पण करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत होणाऱ्या चौकशीसाठी आपण हजर राहू शकणार नसल्याचे रश्मी शुक्ला यांनी एका पत्राच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना कळवले होते. पण, रश्मी शुक्ला यांचा जबाब सीबीआयने नोंदवला आहे. हैदराबादला जाऊन सीबीआयच्या एका विशेष पथकाने रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याची माहिती एका वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीचे रॅकेट उघडकीस आणले होते. अनेक पोलीस अधिकारी, काही एजंट्स आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने इच्छित पोस्टिंग मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर काही फोन टॅप केले होते, ज्यात अनेक खळबळजनक गोष्टी उघडकीस आल्या होत्या, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ तर उडालीच होती, पण याच विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्ला यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.
रश्मी शुक्ला यांनी चौकशीला हजर राहू शकत नाही, असे कळवल्यानंतर सीबीआयचे एक पथक हैदराबादला रवाना झाले. रश्मी शुक्ला यांचा तिथे जबाब नोंदवण्यात आला. त्यांची जवळपास तीन ते चार तास चौकशी करण्यात आली.
फोन टॅपिंग प्रकरणी नेमके काय झाले होते, यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
===============