मुंबई – सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे फोन टॅपिंग प्रकरणावरून वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यात आता शुक्ला यांच्याविषयी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
पुण्याच्या आयुक्त असताना त्यांनी बिल्डरांकडून खंडणी गोळा केल्याचा आरोप बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्या मार्फत हा कार्यक्रम सुरू होता. यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला होता, असाही आरोप राठोड यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते.
संदीप जाधव यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावेळी धनंजय धुमाळ यांना निलंबीत केल्याचं दाखवण्यात आलं. परंतु, त्यांच्यावर काहीही कारवाई केली गेली नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबल. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं राठोड यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यावर दबाव टाकला. तसेच एका पोलिसाला त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी कामाला लावले होते, असा गंभीर आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.