पुणे – रॅपिडो कंपनीने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक थांबवावी, यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रस्त्यावरची लढाई करून रिक्षा चालकांना न्याय मिळवून दिला. आता रॅपिडो कंपनीविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि पुणे रिक्षा फेडरेशन न्यायालयात इंटरव्हेन्शन याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.
यावेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, भाजप आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले, जय महाराष्ट्र शिक्षण संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद, वाहतूक सेवा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले, राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे, सावकाश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भालेराव आदी उपस्थित होते. सध्या रॅपिडो कंपनीने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशन इंटरव्हेन्शन याचिका दाखल करणार आहे. 30 जानेवारी रोजी दिल्लीत स्वतः उपस्थित राहून रिक्षा चालकांची बाजू मांडून तिथेही लढाई जिंकू, असा विश्वास बाबा कांबळे यांनी व्यक्त केला. कायद्याच्या अधीन राहून सनदशीर मार्गाने न्याय मिळवता येतो. हे महाराष्ट्र रिक्षा पंचायतने रॅपिडो कंपनीविरोधातला लढा जिंकून दाखवून दिले. काही बोगस रिक्षा संघटनांनी कायदेशीर मार्ग न निवडता रिक्षा चालकांना संकटात टाकून, गुन्हे दाखल होईपर्यंत चुकीच्या मार्गाने आंदोलन केले.
यामध्ये रिक्षा चालकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. या रिक्षा संघटना महाराष्ट्र रिक्षा पंचायतवर खोटे आरोप करत आहेत, असा आरोप कांबळे यांनी केला आहे. आनंद तांबे म्हणाले, सध्या रॅपिडो कंपनीने प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली. त्याबाबत 30 जानेवारी रोजी सुनावणी आहे. उच्च न्यायालयात लढाई जिंकल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात देखील लढाई जिंकू, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.