मुंबई – “खोट्या गुन्ह्यात गोवायला ही काही मोगलाई नाही. आम्ही काही मूग गिळून गप्प बसलेलो नाही. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशारा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मंगळवारी सरकारला दिला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा लावला जाणार असल्याची चर्चा आहे, त्या पार्श्वभूमिवर पवार बोलत होते.
पवार पुढे बोलताना म्हणाले, “एखाद्या व्यक्तीने जर कोणावर बलात्कार केला नाही आणि तरीही त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा म्हणजे ही मोगलाईच झाली. ही काही योग्य राजकारणाची पद्धत नाही. असे जर व्हायला लागले तर यातून महाराष्ट्रात उठाव होईल. महाराष्ट्रातील सुज्ञ जनता शांत बसणार नाही.
लोकांनाही चांगले कळते की कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून खोट्या प्रकरणात गोवण्यात येत आहे. इतक्या खालच्या पातळीवर राज्याचे राजकारण जर जाणार असेल आणि सरकारी यंत्रणांचा असा अनैतिक वापर होणार असेल,तर आम्हालापण वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल, अशा या अन्यायाविरुद्ध आम्ही मूग गिळून बसणार नाही.’
जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंदविण्यात आले. हा मुद्दा आम्ही सभागृहात उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सदर कार्यक्रमात होते. त्या क्लिपमध्येही स्पष्टपणे दिसते की आव्हाडांनी कुठलेही चुकीचे कृत्य केलेले नाही. या मुद्द्याला समर्पक असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिले नाही, असेही पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक मंगळवारी पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना कठोर शब्दांत ठणकावल आहे.
कोल्हे नाशिकमध्ये; गैरसमज नको
अमोल कोल्हे सध्या “स्वराज्यरक्षक संभाजी’ नाटकाच्या निमित्ताने नाशिकला आहेत. नाटकामुळे ते बैठकीला येऊ शकले नाहीत. काल ते छगन भुजबळ यांनाही भेटले. त्यामुळे त्यांच्याविषयी गैरसमज पसरवू नका, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
“तारीख पे तारीख’च होणार
चांगला वकील देऊन त्यांची बाजू मांडण्याचे काम शिवसेना(ठाकरे गट) करत आहे. तरीही तारीख पे तारीखच होणार. त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करु शकत नाही, केवळ निकाल लवकर यावा अशी विनंती करू शकतो, असेही पवार यांनी म्हटले.