मुंबई – शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केला होता. या वक्तव्यांवर विरोध पक्षाच्या नेत्याकडूंन टीका केली जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रावसाहेब दानवे यांचे शेतकऱ्यांबाबतचे विधान पोरकटपणाचे आहे, अशी टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले, रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) हे केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत, त्यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. असे असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले विधान हे अतिशय पोरकटपणाचे आहे.
दानवे यांचे विधान तथ्यहीन असून केवळ लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न असावा, असे मत देखील अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे…
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे हे बुधवारी जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर (farmers protest) त्यांनी प्रतिक्रिया दिली. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते.