पैठण – महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे. त्यातच आता अतिवृष्टीचे संकट आले आहे. अशा संकटाच्यावेळी राज्यकर्त्यांनी दौरे करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘मी आणि माझं कुटुंब’ असे म्हणत घरातच बसले आहेत. राज्य चालवणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ते पैठण येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनावेळी बोलत होते.
पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे ‘अमर-अकबर- अॅंथनी सरकार’ आहे. सरकार कोण चालवतंय, निर्णय कोण घतंय काहीच कळत नाही, असे दानवे म्हणाले.
राज्यावर आलेल्या संकटकाळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते दौरे करत आहेत. तर राज्याचे प्रमुख मी अन् माझे कुटुंब म्हणत घरात बसले आहेत. हे दुर्देवी राज्यातील जनतेला पाहावे लागत असल्याचेही यावेळी दानवे म्हणाले.