नवी दिल्ली – राज्यातील मराठा व ओबीसी आरक्षणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष भाजप नेत्यांमध्ये सातत्याने शाब्दिक खटके उडताना दिसतात. अशातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी, ‘आरक्षणाबाबत शिवसेनेतील नेत्यांचा अभ्यास कच्चा असल्याचं’ वक्तव्य केलं होत. दानवे यांच्या या टीकेला आज शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दानवेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी, “आम्ही त्यांची शिकवणी लावू… त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू, पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे.” असं वक्तव्य करत त्यांचा समाचार घेतला.
दरम्यान, राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार संजय राऊत यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी शिवसेना खासदारांची एक बैठक पार पडली. या बैठीकीनंतर संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी बोलताना राऊत यांनी, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही आठड्यांपूर्वी दिल्लीत येऊन गेले. त्यांनी पंतप्रधानांना ११ मागण्यांचं निवेदन दिलं होतं. त्यातील अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील आहेत. काही सामाजिक प्रश्नही आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाशीचा प्रश्न आहे. मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विम्याचा प्रश्न आहे. यासर्व प्रश्नांसंदर्भात त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली” अशी माहिती दिली.