आलिया भट्ट आणि रणवीर सिंहने ‘गली बॉय’ मध्ये एकत्र काम केले होते. या सिनेमाला सर्वसाधारण रिस्पॉन्स मिळाला होता. त्यानंतर दोघांनी मिळून अनेक जाहिरातींमध्येही एकत्र काम केले होते. पब्लिकला या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती.
ऑफ स्क्रीन देखील हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. मात्र आता या दोघांच्या मैत्रीमध्ये काही कटुता आली आहे, असे समजते आहे. “इन्शाअल्ला’चा डबा बंद झाल्यावर संजय लिला भन्साळी आलियाला घेऊन “गंगूबाई’ बनवत आहे.
“गंगूबाई’साठी आलियाचे नाव तर निश्चित झाले आहे. पण हिरोचा शोध अजूनही सुरू आहे. भन्साळींना या रोलसाठी रणवीरला घ्यायचे होते. मात्र रणवीरने या सिनेमाला आपला नकार दिला आहे. पण त्याला नक्की कोणती गोष्ट खटकली, हे समजू शकलेले नाही. रणवीरने सिनेमा नाकारल्याचे आलियाला खूप दुःख झाले आहे.
आलिया आणि सलमानला घेऊन भन्साळींनी “इन्शाअल्ला’चा घाट घातला होता. मात्र काही कारणामुळे हा प्रोजेक्ट अडचणीत आला. “इन्शाअल्ला’ नंतर भन्साळींनी “गंगूबाई’चा विचार केला होता. आलियाचे नाव निश्चित झाले असल्यामुळेच रणवीरने या सिनेमाला नकार दिला असे म्हणता येऊ शकेल. नाही तर भन्साळींच्या सिनेमात काम करायला नकार देण्याइतका रणवीर खुळा नाही.