लखनौ : अखील भारतीय हिंदु महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या त्यांच्या द्वितीय पत्नीच्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले. या 40 वर्षीय नेत्याची रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, या गोळीबारात त्यांचा लहान भाऊ जखमी झाला होता. हल्लेखोरांनी त्यांचे मोबाईल काढून घेतले होते.
लखनौचे पोलिस आयुक्त सुजित पांडे यांनी या तपासाची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, रणजीत बच्चन यांची दुसरी पत्नी स्मृती श्रीवास्तव यांना त्यांच्यापासून घटस्फोट हवा होता. त्यांचा खटला 2016 पासून कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित होता. स्मृती यांना दीपेंद्रशी विवाह करावयाचा होता. मात्र रणजीत यांना तिला सोडायचे नव्हते. 17 जानेववारी रोजी रणजीत बच्चन यांनी स्मृती यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादात त्यांनी स्मृती यांना थप्पडही लगावली होती. त्या रागातून त्यांची हत्या करण्यात आली.
रणजीत बच्चन यांची द्वितीय पत्नी स्मृती श्रीवास्तव, तिचा प्रियकर दीपेन्द्र आणि मोटारचालक संजीव गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. मात्र शूटर जितेंद्र याचा शोध अद्याप लागला नाही. त्याला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या हल्लेखोराने स्वत:ला शालीत लपेटले होते. तो चालत आला होता. सीसीटीव्ही फुटेज मिळवत पोलिसांनी हा तपास तडीस नेला. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून एका उपनिरीक्षकासह चार पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.