छत्रपती शिवराय म्हणजे प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान. शिवराय म्हणजे स्त्री रक्षणाची हमी. छत्रपती शिवराय म्हणजे रयतेची पुत्रवत काळजी… हे शिवराय आपल्याला पेलतील? पेलवायलाच हवेत नव्हे हे शिवराय शासाश्वासात अन् रक्ताच्या थेंबाथेंबात भिनायला हवेत तरच अवतरेल स्वराज्य!
रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केल्याचे समजताच त्याचे हातपाय तोडून चौरंग केला. हिंगणघाटचा नराधम मात्र अजूनही न्यायालयाच्या छत्राखाली स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतोय! म्हणून आजही शिवरायांच्या स्वराज्याची छाप प्रत्येकाच्या श्वासाश्वासात आहे.
एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका असलेल्या तरुणीला एका तरुणाने जिवंत जाळल्याची घटना हिंगणघाट येथे नुकतीच घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. स्त्री अत्याचाराची ही महाराष्ट्रातील पहिली घटना नाही. याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. दररोजचं वर्तमानपत्र चाळलं तर त्यात विनयभंग, छेडछाड वा बलात्काराची एखादी तरी बातमी दिसतेच. आजूबाजूला घडणाऱ्या महिलांविरोधी गुन्ह्यांच्या घटना पाहिल्या की शिवरायांच्या विचारांची, शिवरायांच्या धोरणांची कधी नव्हे तेवढी गरज असल्याचे जाणवते. कारण शिवरायांच्या शिवशाहीत महिला जितक्या सुरक्षित होत्या तितक्या त्या कोणत्याच काळात नव्हत्या. कारण शिवरायांचे महिलाविषयक धोरण. मध्ययुगीन काळात शिवरायांचा जन्म झाला.
या काळात महाराष्ट्र परकियांच्या गुलामगिरीत होता. शिवरायांनी महाराष्ट्राला परकियांच्या गुलामगिरीतून मुक्त करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला. मराठी माणसांच्या मनात अस्मिता निर्माण केली. अठरापगड जातींना एकत्र करून त्यांनी स्वबळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. यात सर्वात मोठे कार्य म्हणजे महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेली कठोर पावले. त्यांचे हे पाऊल म्हणजे महिला मुक्तीसाठी केलेली क्रांतीच होती.
हजारो वर्षांपासून अनिष्ट चालीरीती मोडण्याची धमक कोणत्याच राजाने दाखवली नाही, ती धमक शिवरायांनी दाखवली. त्यांनी स्वतःच्या आईला सती जाण्यापासून परावृत्त केले ही त्या काळातील एक सामाजिक क्रांतीच होती. त्याकाळी महिलांना गुलामीची वागणूक दिली जात होती. महिलांची खरेदी-विक्री केली जात होती. महिलांना गुलाम म्हणून वागवले जात होते. शिवरायांनी या सर्व गोष्टींवर बंदी आणली. शिवरायांचे महिलाविषयक धोरण अत्यंत आदराचे होते. जिजामाता या शिवरायांच्या गुरू होत्या. जिजामातेनेच त्यांना स्त्री जातीच्या सन्मानाचे बाळकडू पाजले. म्हणूनच पर स्त्री मातेसमान वागवणारा व शत्रूच्या स्त्रियांना सन्मान देणारा युगपुरुष म्हणून शिवरायांची इतिहासात नोंद झाली.
रांझ्याच्या पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरुण मुलीला उचलून नेऊन भोगली. त्या तरुणीने जीव दिला. जेंव्हा ही गोष्ट शिवरायांना समजली तेव्हा शिवरायांनी त्याच्या मुसक्या बांधून त्याला पुण्याला आणले. त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. जी गोष्ट रांझ्याच्या पाटलांची तीच गोष्ट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची. तीच गोष्ट सकुजी गायकवाड या सेनापतीची. महिलासंबंधी गुन्ह्याला त्यांच्याकडे क्षमा नव्हती उलट कडक शिक्षाच होती. शिवरायांच्या या महिलाविषयक धोरणांमुळेच शिवशाहीत स्त्रिया सुरक्षित होत्या. आजची परिस्थिती मात्र पूर्णपणे भिन्न आहे. महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिलांना सुरक्षा पुरवण्यात सरकार कमी पडत आहे. कायदे असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारांना धाक उरला नाही. राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या महिलाविषयक धोरणांचा अभ्यास करून ते राबविण्याच्या प्रयत्न केल्यास देशात शिवशाही अवतरल्याशिवाय राहणार नाही.
श्याम बसप्पा ठाणेदार