बेंगळुरू – सलामीवीर यशस्वी जयस्वालचे अर्धशतक तर कर्णधार पृथ्वी शॉ याच्यासह प्रमुख फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबई संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बुधवारपासून सुरू झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात खेळ थांबला तेव्हा 5 गडी गमावून 248 धावांची मजल मारली.
Stumps Day 1: Mumbai – 248/5 in 89.6 overs (S Z Mulani 12 off 43, S N Khan 40 off 125) #MPvMUM #RanjiTrophy #Final
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 22, 2022
रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात तब्बल 41 वेळा विजेतेपद मिळवलेल्या मुंबईची यंदाही विजेतेपदासाठीच शर्थ सुरू आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार शॉ याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने जयस्वालसह डावाची सुरुवात करताना आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने 87 धावांची सलामी दिली. शॉ स्थिरावलेला असताना 47 धावांवर बाद झाला. त्याने 79 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावला.
दुसरीकडे जयस्वालने आपला फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळी केली व शतकही साकारणार असे वाटत असतानाच तो 78 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत तब्बल 163 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार मारला. त्यापूर्वी त्याने अरमान जाफरसह संघाचे शतक फलकावर लावले. जाफरही चांगला खेळत असताना 26 धावांवर परतला. यंदाच्या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत असलेल्या सुवेद पारकरने मात्र निराशा केली. तो 18 धावांवर परतला. त्यानंतर सर्फराज खानने हार्दिक तामोरेसह डाव सावरला.
तामोरेने आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केली. त्याने 24 धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र, सर्फराजने शम्स मुलाणीला साथीला घेत सावध फलंदाजी करत दिवसअखेर संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. खेळ थांबला तेव्हा सर्फराज 40 र मुलाणी 12 धावांवर खेळत आहेत. मध्य प्रदेशकडून सारांश जैन व अनुभव आग्रवाल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. कुमार कार्तिकेयने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
मुंबई पहिला डाव – 90 षटकांत 5 बाद 248 धावा. (यशस्वी जयस्वाल 78, पृथ्वी शॉ 47, अरमान जाफर 26, हार्दिक तामोरे 24, सुवेद पारकर 18, सर्फराज खान खेळत आहे 40, शम्स मुलाणी खेळत आहे 12, सारांश जैन 2-31, अनुभव आग्रवाल 2-56, कुमार कार्तिकेय 1-91).