राजकोट – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मंगळवारी दुसऱ्या दिवशी सौराष्ट्रने दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात 8 बाद 384 अशी भक्कम स्थिती प्राप्त केली. अर्पित वासवदाचे दमदार शतक व चेतेश्वर पुजाराचे संयमी अर्धशतक बंगालच्या गोलंदाजांची डोकेदुखी ठरले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारून सौराष्ट्रने धडाक्यात सुरुवात केली. हार्विक देसाई व अवी बारोट यांनी 82 धावांची सलामी दिली. हार्विक बाद झाल्यावर बारोटने विश्वराज जडेजाच्या साथीत धावांची गती वाढविली. या जोडीने आपापली अर्धशतके पूर्ण केली. स्थिरावलेले हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर अर्पितने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तब्येत अचानक बिघडल्याने मैदान सोडलेला चेतेश्वर पुजारा पुन्हा मैदानात उतरला व त्याने अर्पितला चांगली साथ दिली. त्याने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले.
It’s Stumps on Day 2⃣ of the @paytm #RanjiTrophy #Final between Saurashtra and Bengal.
Scorecard ? https://t.co/LPb46JOjje #SAUvBEN pic.twitter.com/wi6PDmrqsb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 10, 2020
अर्पितने अंतिम सामन्यात शतकी पल्ला गाठला. पुजारा 66 धावांवर बाद झाला. त्यापूर्वी अर्पितने पुजारासह 6 व्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी केली व संघाला त्रिशतकी मजल मारून दिली. शतक पूर्ण झाल्यानंतर अर्पितही परतला. त्यानंतर दिवसातील उर्वरित षटके खेळून काढताना चिराग जानी व धर्मेंद्रसिंह जडेजा यांनी आणखी नुकसान होऊ दिले नाही. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चिराग व धर्मेंद्रसिंह दोघेही प्रत्येकी 13 धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक – सौराष्ट्र पहिला डाव – 160 षटकांत 8 बाद 384. (अर्पित वासवदा 106, चेतेश्वर पुजारा 66, अवी बारोट 54, विश्वराज जडेजा 54, चिराग जानी खेळत आहे 13, धर्मेंद्रसिंह जडेजा खेळत आहे 13, आकाशदीप 3-77).