नवी दिल्ली – अपेक्षित नसताना मला खेलरत्न पुरस्कार मिळाल्याने आनंद तर झालाच आहे. मात्र, आता या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून टोकियोत ऑलिम्पिक पदक खुणावत असून ते मिळवून देणारच, असा निर्धार भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केला आहे.
भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार मला कधी मिळेल असे वाटलेच नव्हते. त्यामुळे हा पुरस्कार जाहीर झाल्याने मला आश्चर्याचा धक्काच बसला. अर्थात याचा आनंद झाला असला तरीही आता माझ्याकडून हॉकीप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर मला जास्त आनंद होइल, असेही राणीने सांगितले.
मला जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजले तेव्हा मला भावना व्यक्तच करता येत नव्हत्या, केवळ डोळ्यांतून अश्रू वाहात होते. आता आगामी काळात भारतीय हॉकीचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी सातत्याने कठोर मेहनत घेणार आहे. जपानमध्ये पुढील वर्षी टोकियो ऑलिम्पिक होत असून त्यात देशाला पदक मिळवून देण्यासाठी क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करण्यासाठी आता हुरूप आला आहे, असेही ती म्हणाली.