मुंबई – नारायण राणे यांनी आत्मचरित्रातून केलेल्या आरोपांचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी खंडन केले आहे. नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात “बाळासाहेबांनी फोन करुन बोलवणं आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेली धमकी’ या आरोपात तथ्य नसून या गोष्टी मी पहिल्यांदाच ऐकत आहे, असेही शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले.
जोशी म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे एक आश्चर्यच होते. मी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होतो. कोणत्याही सभेला जाताना ते मला घेऊन जायचे. यामुळे फायदा होतो, तसा तोटाही असतो. यातून काही शत्रूही निर्माण झाले. बाळासाहेबांनी नारायण राणेंना फोन केला होता आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली धमकी, यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
25 वर्षे एका पक्षात काम केले, त्याने आपल्या सहकाऱ्यांवर आणि नेत्यांवर टीका करणे योग्य नाही. ज्यांच्यामुळे आपण मोठे होतो. त्यांच्याविरुद्ध बोलायचे यातून त्यांची पातळी दिसते, अशा शब्दांत मनोहर जोशी यांनी राणेंवर पलटवार केला आहे.
जोशींच्या वागणुकीमुळे शिवसेनेची आज वाईट अवस्था झाल्याचा आरोपही राणे यांनी केला होता. मनोहर जोशी यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत नारायण राणे यांच्यावरच टीकास्त्र सोडले. तसेच चांगलं शिक्षण महत्वाचे आहे, काही लोकं शिक्षित नाही, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे राणे यांना लगावला.
मनोहर जोशी हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते. मनोहर जोशींनी कान भरल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राणेंना डावलून सुभाष देसाईंना विरोधी पक्ष नेते पद दिल्याचा दावा देखील राणेंनी पुस्तकात केला होता. या आरोपाचे देखील मनोहर जोशी यांनी खंडन केले आहे.