मुंबई: आज ठाकरे सरकारमधील मंत्र्याना सरकारी बंगल्याचे वाटप झाले. सरकारी निवासस्थानामध्ये अर्थातच सर्वाधिक चर्चेचा बंगला म्हणजे मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला होय. वर्षा बंगल्यावर मंत्र्यांची रेलचेल, बैठकी, नियोजन, चर्चा हे सर्व घडत असते. मात्र “वर्षा’शिवाय दुसरा चर्चेत असलेला बंगला म्हणजे “रामटेक’ होय.
“रामटेक’ बंगल्याबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. छगन भुजबळ हे आघाडी सरकारच्या काळात याच बंगल्यात वास्तव्यास होते. 1999 च्या सुमारास भुजबळ या बंगल्यात आले. मात्र त्यांच्यावर तेलगी प्रकरणी आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याशिवाय फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांना तुरुंगवास झाला.
फडणवीस सरकारच्या काळात हा बंगला मग एकनाथ खडसे यांना मिळाला. मात्र अवघ्या दीड वर्षातच खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदाला मुकावे लागले. भुजबळांच्या आधी हा बंगला गोपीनाथ मुंडेंकडे होता. मुंडेंवरही त्यावेळी विविध आरोप झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्र्यांना रामटेक बंगला नकोसा वाटत आला आहे.