लाहोर – भारतातील केंद्र सरकार भारतीय क्रिकेट संघाला आशिया करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्याची परवानगी देणार नाही. त्यामुळेच या स्पर्धेतून भारतीय संघ माघारही घेणार असल्याचे समोर आल्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा सगळा तोरा गळून पडला आहे. मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी अखेर आयसीसीकडे धाव घेत त्यांना यात मध्यस्थी करण्याची विनवणी केली आहे.
भारतीय संघ जर आशिया करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानात येणार नसला तर आम्हीही भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी भारतात येणार नाही, असे जोशात सांगितलेल्या राजा यांचा नक्षा उतरला असून आयसीसीनेच यातून मार्ग काढावा असे मत व्यक्त केले आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यात सध्या तणाव आहे, त्यामुळेच हे दोन देश केवळ आशिया तसेच आयसीसीच्या स्पर्धांमध्येच एकमेकांशी खेळतात. त्यातच सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात जाण्याची परवानगी नाकारली तर आम्हाला सहभागी होताच येणार नाही, असे राजा यांनी म्हटले होते.
जर भारताने आशिया करंडक स्पर्धेतून माघार घेतली व त्यानंतर आम्ही भारतातील विश्वकरंडकातून माघार घेतली तर तो विश्वकरंडक कोण पाहणार. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडकातील भारत व पाकिस्तान यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी मेलबर्न मैदानावर तब्बल 90 हजार चाहते होते यावरूनच या दोन संघातील सामन्यांची क्रेझ लक्षात येते. आता आयसीसीनेच यात हस्तक्षेप करावा, अशा शब्दात विनवणी केली आहे.
काही फरक पडत नाही – ठाकूर
आशिया करंडक अन्यत्र हलवण्यात आला तरच भारतीय संघ त्यात सहभागी होईल. मात्र, भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली तरीही काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांची खिल्ली उडवली आहे.