पुणे – कॅन्टोन्मेंट मतदारसंघात रमेश बागवे यांचा दांडगा जनसंपर्क, मतदारसंघातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन केलेल्या विकास कामांच्या जोरावर मंगळवार पेठेतील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी रमेश बागवे यांनाच निवडून देतील. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास कॉंग्रेसच्या नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी व्यक्त केला.
बागवे यांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठ येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेट्टी बोलत होत्या. यावेळी आमदार विश्वजीत कदम यांच्यासह नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, विजय चंडालिया, भगवान धुमाळ, सौ. नीलिमा लालबिगे, रशीद खिजर, आमिर शेख, विजय खळदकर, विशाल मलके, वैशाली रेड्डी, ऍड. नितीन परतानी, रवी आरडे, साहिल केदारी, राजेश शिंदे, वाल्मिकी जगताप, कल्पना भोसले व सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शेट्टी यांचे पती सदानंद शेट्टी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी सुजाता शेट्टी यांनी बागवे यांनाच मतदारसंघातून बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
शेट्टी म्हणाल्या की, या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केल्याने त्यांच्याबाबत मतदारांमध्ये भावनिक नाते आहे. तसेच त्यांचा जनसंपर्कही दांडगा असून त्यांनी शासन तसेच महापालिकेच्या माध्यमातून अनेक लोकपयोगी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मतदार निश्चितच त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या मेळाव्यात यावेळी भीम आर्मीचे नेते दत्ता पोळ यांनीही रमेश बागवे यांना पाठिंबा देऊन मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.