मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा-शिवसेनेमधील (शिंदे गट) जागावाटपावरून केलेल्या वक्तव्यानंतरराज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी “फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे हे लोक आहेत” अशा शब्दात शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता शिंदे गटाकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळाले आहे.
शिवसेना आमदार (शिंदे गट) रामदास कदम यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. रामदास कदम यांनी, “आपणा सर्वांना माहिती आहे शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो. ज्याला कावीळ झालेली असते त्याला जग पिवळं दिसतं. म्हणूनच संजय राऊतांनी असं काहीतरी बोलणं हे हास्यास्पद आहे.”
रत्नागिरीमधल्या खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या आयोजनासाठी रामदास कदम खेडमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी ही टीका केली. कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच संजय राऊतांवर देखील हल्लाबोल केला.
रामदास कदम यांनी, “उद्धव ठाकरे यांची खेड येथे सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले माझ्या हातात काही नाही, मी रिकाम्या हातांनी आलोय. परंतु मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकांना देण्यासाठी त्यांच्या हातात पुष्कळ गोष्टी होत्या. परंतु त्यांनी त्या दिल्या नाहीत.” असे त्यांनी यावेळी म्हटले.