मुंबई – गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू होत्या. आज अखेर या घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे. राजभवनात आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आ़ठवले यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की “भाजपने शिवसेनेला धडा शिकवला आहे. सर्व काही व्यवस्थित होईल असे अमित शाह सांगत होते आणि आता तसेच घडले आहे” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. “मागच्या आठवडयात अमित शाहंना मी भेटलो त्यावेळी त्यांनी चिंता करु नका, सर्व काही व्यवस्थित होईल, असे ते आपल्याला म्हणाले होते” याची आठवण रामदास आठवले यांनी यावेळी करुन दिली.
दरम्यान, राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.