नागपूर – संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव सुचवण्यात आल्यानंतर खुद्द पवारांनी अशी काही चर्चा नसल्याचे सांगून, त्या वादावर नुकताच पडदा टाकला होता. मात्र, आता भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी पुन्हा हा विषय नागपूरात काढून चर्चेची राळ उडवून दिली आहे.
करोना काळात मृत्यू झालेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी व एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी नागपुरात बोलताना आठवले म्हणाले की, राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यास आम्हालाच फायद्याचे आहे. त्यांच्यामुळे आम्हाला चांगली संधी असते. सध्या कॉंग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे शरद पवारांना (युपीएऐवजी) कॉंग्रेसचे अध्यक्ष करावे. पवार यांना कॉंग्रेस पक्षाने अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना पंतप्रधान होण्याची संधी असतानाही डावलले. संसदीय बोर्डाच्या बैठकीतही त्यांच्याशी योग्यपध्दतीने वागत नव्हते. दस्तुरखुद्द सोनीया गांधी यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. पवार यांच्यावर कॉंग्रेसमध्ये असताना अन्याय झाला. आता हा अन्याय दूर करण्याची संधी कॉंग्रेसजवळ आहे. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष केल्यास काय हरकत आहे, असेही आठवले म्हणाले.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यांची गाडी तशीच पुढे चालवत आठवले असेही म्हणाले की, शरद पवार जर एनडीएमध्ये आल्यास मोदींचे हात आणखी बळकट होतील, असेही आठवले म्हणाले. अंबानी व अदानी आधीच श्रीमंत आहेत. त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यांच्या फायद्यासाठी हे कृषी कायदे तयार करण्यात आले असतील, हा आरोपही आठवले यांनी फेटाळून लावला.