मुंबई – एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत उद्धव ठाकरे यांना केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खालीच खेचलं नाही तर पक्षातील त्यांचं स्थान देखील डळमळीत केलं आहे. शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सातत्याने आपण शिवसेना सोडली नसल्याची भूमिका मांडली होती. आमचा गट हाच खरी शिवसेना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव घेत पक्षावर व निवडणूक चिन्हावर थेट दावा सांगितला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याने निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असं असतानाच आज (शुक्रवार) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असून शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांनाच मिळेल असा दावा केला आहे. ( Ramdas Athavle on Eknath Shinde )
काय म्हणाले रामदास आठवले?
एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा करताना आठवले यांनी, “खरी शिवसेना जी आहे ती आता एकनाथ शिंदे यांची आहे. दोन तृतीयांश बहुमत त्यांच्या बाजूला आहे. त्यांना निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण ही निशाणी मिळेल. कारण, एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे बाळासाहेबांची आण, मग त्यांना का मिळणार नाही धनुष्यबाण. त्यामुळे धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनांच मिळणार आहे, हे जवळपास १२ खासदार आणि ४० आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, दुसरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे.” असा दावा केला.
ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे… – आठवलेंची काव्यात्मक टिपणी
दरम्यान, शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे यांनी अनेकदा निशाणा साधला आहे. बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावू नये अशी भूमिका देखील उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. याबाबत भाष्य करताना आठवले यांनी, “ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदे राहिले नाहीत अंधे ते तर आहेत बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे बंदे.” त्यामळे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो घेऊन, बाळासाहेबांचा फोटो वापरू नये, वापरू नये असं जे त्यांना म्हटलं जातय. शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबडेकरांचा फोटो सगळे वापरतात, मग बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसेनेत तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत, मग त्यांना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा का अधिकार नसावा? त्यामुळे त्यांना तो पूर्ण अधिकार आहे.” अशी काव्यात्मक टिपणी केली. ( Ramdas Athavle on Eknath Shinde )
आरपीआयला राज्यात लाल दिवा
भाजप व शिंदे गटाने एकत्र येत राज्यात सत्तास्थापन केली आहे. शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार देखील झाला आहे. मात्र यामध्ये मित्रपक्ष अथवा अपक्षांना एकही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. पुढील विस्तारात आरपीआयला मंत्रिपद मिळणार का? यावर भाष्य करताना आठवलेंनी, “भाजपा मंत्रीपद देणार आहे, देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा नक्की विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही भाजपासोबत मागील आठ-दहा वर्षांपासून आहोत. त्यामुळे आम्हाला नक्की मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे. खातं कोणतं द्यायचं तो अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे खातं चांगलं राहील अशी आमची अपेक्षा आहे.” अशी माहिती दिली.