मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र भाजपच्या बड्या नेत्यांच्या गाठीभेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजप व शिंदे गट एकत्र लढणार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र भाजप – शिंदेंच्या या युतीत मनसेलाही स्थान मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मनसेला सोबत घेण्यावरून आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) असहमती दर्शवली आहे. आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, मनसेला सोबत घेण्याची आवश्यकता नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मनसेची अजिबात आवश्यकता नाही ( BJP MNS alliance )
रामदास आठवले यांनी मनसेसोबत युतीच्या मुद्द्यावर भाष्य करताना, “माझं मत असं आहे की मनसेची काही आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात आवश्यकता नाही. आता एकनाथ शिंदेंचा गट देखील आपल्या सोबत आलेला आहे. मागील वेळी शिवसेना आणि आम्ही स्वतंत्र लढलो होतो. भाजपी आणि आरपीआय एकत्र आणि शिवसेना वेगळी लढली होती. तरी देखील भाजपा आणि आरपीआयने जवळपास ८२ जागा निवडून आणल्या होत्या. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आमच्या सोबत आलेली असल्याने, आम्हाला मुंबई महापालिका निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमतापेक्षाही अधिक जागा आम्हाला मिळतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.” असं स्पष्टच सांगितलं.
राज ठाकरेंना सोबत घेतलं तर… ( BJP MNS alliance )
“राज ठाकरेंना सोबत घेतलं तर उत्तर भारतीयांची, दक्षिण भारतीय लोकांची मतं ही मतं आपल्याला मिळणार नाहीत. मनसेला सोबत घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. भाजपाला त्यांना सोबत घेणं परवडणार नाही. त्यांना आपल्या सोबत आणून फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. दलित समाज आता जो मोठ्याप्रमाणावर भाजपासोबत आहे, त्यांच्यामध्ये देखील गैरसमज होऊ शकतो.” असे मतही आठवले यांनी मांडले.
राज ठाकरेंना डिवचलं ( BJP MNS alliance )
“राज ठाकरे हे राज्यातील सक्रीय नेते आहेत, ते चांगलं भाषण करतात. त्यांच्या सभा देखील मोठ्या होतात, पण त्यांना मतं मिळत नाहीत. अशाप्रकारची परिस्थिती आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यावं या मताचा मी अजिबात नाही. राज ठाकरेंची अजिबात आवश्यकता नाही.” असं म्हणत आठवले यांनी यावेळी राज ठाकरेंना टोला लगावला.