नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणाचं फारसं महत्त्व वाटत नाही. मी हार्वडपेक्षा हार्डवर्कला प्राधान्य देतो, हे त्यांचे वक्तव्य बरंच काही स्पष्ट करणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तींची गरज वाटत नाही. आपण तज्ज्ञांपेक्षा मोठे आहोत, असा त्यांचा आविर्भाव असतो. याचीच परिणती देशातील कोरोना परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात होत असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा यांनी केले.
‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. यावेळी रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना परिस्थिती हाताळण्यात का अपयशी ठरले, याची तीन प्रमुख कारणे सांगितली. एक म्हणजे नरेंद्र मोदी यांना तज्ज्ञ आणि त्यांच्या अनुभवी सल्ल्याचे वावडे आहे. मुळात पंतप्रधान मोदींना शिक्षणाचं फारसं महत्त्व वाटत नाही.
पंतप्रधान मोदी स्वत:च मला तज्ज्ञांची गरज नाही, असे सांगतात. आपण तज्ज्ञांपेक्षा मोठे आहोत, असे मोदींना वाटते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला हवा तसा सल्ला देणाऱ्याच तज्ज्ञांचा सल्ला घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीतरी भव्यदिव्य आणि नाट्यमय करण्याचा सोस टाळून देशातील आघाडीच्या साथरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार धोरण आखले असते तर भारतात कोरोनाचा प्रकोप बराच कमी असता. घरातील लाईट बंद करुन दिवे लावणे किंवा थाळ्या वाजवणे हा निव्वळ गवगवा आणि अंधश्रद्धेचा प्रकार असल्याची टीकाही यावेळी रामचंद्र गुहा यांनी केली.
देशातील कोरोना परिस्थितीच्या चुकीच्या हाताळणीसाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व हे प्रमुख कारण जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी यांनी केवळ फायद्याचा विचार करुन मंत्रिमंडळ तयार केले. सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेतही स्वत:च्या मर्जीतील लोकांना स्थान दिले. तर प्रशासनात होयबा अधिकारी आणि नोकरशाहाच आपल्या सभोवताली राहतील, याची त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे आताच्या परिस्थितीलाही मोदींचे नेतृत्त्वच जबाबदारी आहे, अशी टीका रामचंद्र गुहा यांनी केली.