नगर – नगर शहर झपाट्याने वाढत असतांना वाहनांची संख्या देखील मोठ्या संख्येने दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नगरचे रस्ते रुंद व अडचणीचे ठरत असल्याने शहरात वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने नवीन वाहने रस्त्यावर धावत असतांना वाहतूक नियंत्रण करणारी व्यवस्थाच तोकडी पडत असल्याने शहराची वाहतूक नियंत्रण व्यवस्था रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे. एवढ्या मोठ्या नगर शहराच्या वाहतूक नियंत्रणासाठी अवघे 52 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही अन्य कामांसाठी नियुक्ती झाली तर शहरातील रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारीच दिसत नाही.
नगर शहरात प्रामुख्याने ज्या काही चौकांमध्ये वाहतूक कोंडी होते. तेथे तरी वाहतूक पोलिसांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. मात्र अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे बहुतांशी चौकात पोलीस कर्मचारी नसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मनमाड, दौंड, कल्याण व पाथर्डी हे प्रमुख महामार्ग शहरातून जातात. त्यामुळे हजारोंच्या संख्येने वाहने दररोज ये-जा करतात. त्यात नगर शहरातील नागरिकांची वाहने असतात. त्यामुळे या सर्व वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरातील प्रमुख चौकामध्ये वाहतूक नियंत्रण पोलिसांची अवश्यकता असते.
अवजड वाहनांसह अन्य वाहने बाह्यवळण रस्त्याने जात असले तरी ते अंतर लांब पडत असल्याने बहुतांशी वाहने शहरातून जाणे पसंत करीत आहे. या बाह्यवळण रस्त्यावरील पोलीस कधीमधी आढळतात. विशेषतः रात्रीच्यावेळी हे पोलीस कर्मचारी आर्वजून हजर असतात. मात्र दिवस कोणीची कर्मचारी नसल्याने अवजड वाहने देखील शहरातून जाणे पसंत करतात. परिणामी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. त्यात गेल्या काही दिवसांपासून नगर शहरातील उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने सक्कर चौक ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात येत आहे. तरी वाहन चालक केडगाव बाह्यवळण रस्त्याने नेप्ती चौकातून शहरात प्रवेश करीत असल्याने दिल्ली दरवाजा, न्यु आर्टस् महाविद्यालय, पत्रकार चौक, प्रेमदान चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.