हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात अत्यंत मानाच्या स्थानावर असलेले अजरामर नाव म्हणजे रवींद्र जैन ! साध्या, सहज गुणगुणता येणाऱ्या परंतु तितक्याच मधुर अशा त्यांच्या रचना आजही संगीतप्रेमींना भुरळ घालतात. 28 फेब्रुवारी 1944 रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात जन्मलेले रवींद्र हे सात भावंडांपैकी तिसरे होते. आज म्हणजेच शनिवारी रविंद्र जैन यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी 9 ऑक्टोबर 2015 रोजी वयाच्या 71 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
‘चितचोर’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘गीत गाता चल’, ‘नदिया के पार’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सदाबहार गाणी आणि संगीत देणारे रवींद्र जैन जन्मापासूनच अंध होते. रामानंद सागर यांच्या रामायणात गायलेल्या त्यांच्या चौपाई आजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1972 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. उत्तम गायक असणाऱ्या रवींद्र जैन यांनी एकापेक्षा एक चित्रपटांना संगीतही दिले. त्यांनी अनेक प्रसिद्ध बॉलिवूड गाणी देखील लिहिली आहेत.
कविता, शायरी आणि गीतात्मक आकलन यांची सांगड घालत त्यांनी दखलपात्र काम केले आहे. रवींद्र जैन यांनी बालपणात पंडित गमदी लाल, पंडित जनार्दन शर्मा आणि पंडित नथुराम शर्मा यांच्याकडून संगीताचे बारकावे शिकले आणि प्रयाग संगीत समितीकडून शास्त्रीय संगीताची दीक्षा घेतली.
रवींद्र जैन1969 मध्ये मुंबईला पोहोचले. राधेश्याम झुनझुनवाला यांना त्यांच्या एका चित्रपटात त्यांचे संगीत हवे होते. 1971 मध्ये रवींद्र जैन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली प्रथमच पाच गाणी रेकॉर्ड करण्यात आली. 1972 मध्ये ‘कांच और हीरा’च्या अपयशानंतर त्यांनी ‘चोर मचाये शोर’, ‘चितचोर’, ‘तपस्या’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘अंखियों के झरोखो से’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’, ‘इन्साफ का तराजू’, ‘प्रतिशोध’ अशा अनेक एकाहून एक चित्रपटांना सुरेल संगीत दिले.
चित्रपटांव्यतिरिक्त, रवींद्र जैन यांनी प्रसिद्ध पौराणिक मालिका ‘रामायण’ला देखील संगीत दिले. त्याचबरोबर त्यांनी अनेक ‘चौपाई’ना आवाज दिला. ‘राम तेरी गंगा मैली’च्या संगीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. ते केवळ संगीत क्षेत्रातच कर्मयोगी नव्हते तर साहित्य क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवले.
आपल्या गाण्यांमधून त्यांनी अस्सल भारतीय संगीताला जगासमोर आणले. रवींद्र जैन यांना 2015 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला होता. अर्थात आज रवींद्र जैन हयात नाहीत, पण त्यांची कीर्ती कायम आहे आणि ती सुरेल धून ही लोकांच्या स्मरणात कायम राहील.