उदयपूर – लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळून झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा राम मंदिराचा उल्लेख केला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्या राम मंदिरासंबंधी सूचक विधान केले आहे. रामाचं काम करायचं आहे. आणि रामाचं काम होणारच, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
उदयपूर येथे आयोजित संघ शिक्षा वर्ग प्रशिक्षणादरम्यान मोहन भागवत बोलत होते. भागवत म्हणाले, रामाचं काम करायचं आहे आणि रामाचं काम होणारच. रामाचं काम करायचं आहे म्हणजेच आपलं काम करायचं आहे. आपलं काम आपण स्वत: केले तर ठीक, दुसऱ्याकडे सोपवले तर कोणाला तरी लक्ष ठेवावे लागते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधीही संघाने राम मंदिरासंबंधी भाजप सरकारप्रती नाराजी व्यक्त केली होती.
लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिर निर्माण सुरु करण्यात येईल, मग केंद्रात कोणाचेही सरकार असो असे वक्तव्य संघच्या एका नेत्याने केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही पर्यायाचा विचार केला जाणार नाही असे आधीच स्पष्ट केले आहे. संसदेत अध्यादेश आणून राम मंदिर निर्माण करण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून होत आहे.