शिवसेनेची अयोध्या प्रकरणावरून टीका
मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून देशात चर्चेचा मुद्दा ठरलेला म्हणजे अयोध्या जमिन प्रकरण…या प्रकरणावर मागील कितीतरी वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.दरम्यान, अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली याचिकांवर सुनावणी झाली. 40 दिवस युक्तीवाद ऐकल्यानंतर बुधवारी याबाबत सुनावणी पूर्ण झाली. आता लवकर याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना राम मंदिराला मुस्लीमांचा नाही तर निधर्मी राजकीय बेगड्यांचा विरोध असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. एका आक्रमकाने हिंदूंच्या श्रद्धास्थानावर अतिक्रमण केले. ते हटवण्याचा हा संघर्ष आहे. त्यात रामरायांचा विजय होईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
येत्या 17 नोव्हेंबर रोजी राम मंदिराबाबत निकाल लागेल. तसेच हा दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्याचा आहे. तीस वर्षांपूर्वी सगळ्यांनीच झिडकारलेल्या प्रभू रामाच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. 17 नोव्हेंबरला रामभक्त शिवसेनाप्रमुखांच्या समाधीस्थळावर फुले उधळतील, असे शिवसेनेने आपल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून म्हटले आहे. रामजन्मभूमी कोणाची हा निकाल सर्वोच्च न्यायालय देईल. परंतु रामजन्मभूमीचा वाद हा निरर्थक आणि हास्यास्पद असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.
बाबर हा अफगाणिस्तानातून आला असून त्याने मंदिरे तोडून मशिदी बांधल्या. हेच अयोध्येतही घडले असून रामजन्मभूमीवर एक मशिद उभी राहिली. बाबराच्या मशिदीत ज्या मुसलमानांच्या भावना गुंतल्या आहेत त्यांना आम्ही भारतवासी कसे मानणार? प्रश्न फक्त मुसलमानांचाच नाही, तर बाबराच्या बेकायदेशीर मशिदीसाठी मातम करणारे अनेक राजकीय बेगडी निधर्मी आहेत. मुसलमानांपेक्षा या बेगड्यांनीच राममंदिरास विरोध केला, असे म्हणत प्रभू श्रीराम अयोध्येत जन्मास आले नाही तर कोठे जन्मले? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.