पुणे – “प्रत्येक देशाच्या अस्मिता ह्या त्या त्या देशाची, राष्ट्राची मोठी शक्ती असते. ती शक्ती राष्ट्राचे गौरव आणि सन्मान वाढवत असते. राममंदिर हा भारताच्या अस्मितेचा, राष्ट्रजागरणाचा विषय आहे,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केले.
सा. विवेकच्या आगामी ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त दि.२७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२० रोजीपर्यंत ‘राष्ट्र जागरण व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार दि., २७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर संकल्पना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी प्रास्ताविक मनोगतातून व्याख्यानमालेमागील उद्देश विषद केला.
यावेळी बोलताना भैयाजी म्हणाले, ” राममंदिर आंदोलनाच्या इतिहासातील ५ ऑगस्ट २०२० हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवसापासून आपली राममंदिर ते राष्ट्र मंदिर ही वाटचाल सुरू आहे. देशाच्या अस्मितेच्या जागरणाला सोमनाथ मंदिरापासून सुरुवात झाली. देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक संकट असतानाही सोमनाथाचे भव्य मंदिर उभे राहिले. पुढेसुद्धा ही गुलामीची प्रतिके दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते.
या कालक्रमामध्ये अयोध्येचे स्थान वेगळे आहे. साडेचार हजार वर्षांपूर्वी देशावर आक्रमण केलेल्या व्यक्तीने विजयाचे चिन्ह म्हणून अयोध्येतील रामजन्मभूमीवर ढाचा उभा केला, त्याला स्वतःचे नाव दिले. जगातील कोणतेही मशीद व्यक्तीच्या नावाने ओळखली जात नाही पण अयोध्येतील मंदिर पाडून तिथे बाबरी मशीद उभी राहिली. समाजाची मानसिकता दुर्बल करणे हा यामागील हेतू होता. गुलामीची प्रतिके दूर करणे हे कोणत्याही देशाचे कर्तव्य असते. अशा प्रतीकांना दूर करण्यासाठी या देशामध्ये अनेक प्रयत्न झाले, त्यासाठी अनेकांचा विरोधही सोसावा लागला.”
राममंदिर कशासाठी? याबाबत बोलताना भैयाजी म्हणाले, ” रामजीवन म्हणजे राष्ट्र जीवन आहे. या देशातल्या प्रत्येक सामन्य व्यक्तीला वाटले पाहिजे की हे माझे श्रद्धास्थान आहे.”
देशाच्या, राष्ट्राच्या हितासाठी, विकासासाठी या मंदिराची उभारणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास , कारसेवकांचे योगदान, आदर्श रामराज्य, भविष्यातला भारत, सामाजिक बंधुभाव आदी मुद्यांवर त्यांनी विचार प्रकट केले.
व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन विवेकचे मुख्य उपसंपादक निमेश वहाळकर यांनी केले. उद्या सोमवार दि. २८ सप्टेंबर २०२० रोजी सायं. ६ वा श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोंविददेवगिरी महाराज हे ‘धर्मविचार : काल, आज आणि उद्या ‘ याविषयावर आपले विचार प्रकट करणार आहेत. हे व्याख्यान सा. विवेकच्या फेसबुक पेज व युट्यूब चॅनलच्या https://www.facebook.com/VivekSaptahik/live या लिंकवरून पाहता येणार आहे.