अग्नीशमन विभागाकडून नोंदणीच नसल्याने फायर ऑडिटचा प्रश्नच उद्भवत नाही
नगर: दोन आठवड्यांपूर्वी सुरतमध्ये एका कोचिंग क्लासच्या इमारतीला आग लागून झलेल्या दुर्घटनेत विशीच्या आतील 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर नगरमधील कोचिंग क्लासची पाहणी करता येथील सर्वच कोचिंग क्लासच्या मुलांची सुरक्षा राम भरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरमध्ये गणित, सायन्सच्या क्लासेसबरोबरच स्पर्धा परिक्षांचेही मोठे पेव फुटले आहे. त्यात पोलीसभरतीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या निरनिराळ्या अकॅडेमी, एम. पी. एस. सी, यू. पी. एस. सी. सारख्या परीक्षांचा समावेश आहे. या अकॅडेमींची किंवा कोचिंग क्लासची संख्या मोठी आहे. ती नेमकी किती, असा प्रश्न महा पालिकेच्या शिक्षण मंडळाला विचारला असता, त्यांनी या सर्व खासगी संस्था असल्याने त्यांची नोंदणी आमच्याकडे नाही, असे उत्तर मिळाले. तर झेड. पी. शिक्षण मंडळाकडूनही मिळालेले उत्तर यापेक्षा वेगळे नाही. शहरात व उपनगरात चालणारे कोचिंग क्लास हे काही इमारतींच्या सदनिकांमधून चालतात किंवा काही ऍकॅडेमीच्या पत्र्याच्या शेड आहेत. तेथे त्यांचे शिक्षण चालते. ज्या सदनिकांमधून कोचिंग क्लास चालतात, ते एकतर क्लास चालकाच्या मालकीचे असतात किंवा भाड्याने घेतलेल्या असतात.
मालकीची सदनिका किंवा इमारत असल्यास त्याचे फायर ऑडिट आवश्यक असते. त्याचा अहवाल अग्नीशमन दलाला दर सहामहिन्यांनी पाठवावा लागतो. मात्र असा कोणत्याही क्लासचा फायर ऑडिटचा अहवाल अग्नीशमन दलाकडे नाही. शिवाय ज्या इमारतींमध्ये कोचिंग क्लासेस चालतात, त्या इमारतींची नोंद रहिवासी क्षेत्राखाली केली असल्याने त्यांचा अहवाल अग्नीशमनदलाकडे येत नाही. या उलट हॉटेल, रुग्णालये, सिनेमागृह, मॉल, शैक्षणिक संस्थांसारख्या व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट दर सहा महिन्यांनी अग्नीशमन दलाकडे येत असते. ज्या ऍकॅडेमींचे कामकाज पत्र्याच्या शेडमधून चालते, अथवा ज्या इमारतींची उंची 15 मीटर पेक्षा कमी आहे, त्या इमारतीत अग्निशमनासाठीची उपाययोजना केलेली असावी. ज्या इमारतींची उंची 15 मीटर पेक्षा जास्त आहे. त्यांनी फायर ऑडिटकरून घ्यावे. तसेच ज्या सदनिकांमधून कोचिंग क्लासस चालतात तेथील जिने रुंद असावेत. जेणे करून एखादी दुर्घटना घडल्यास इमारतीतून सहजगत्या बाहेर पडता येईल.
आगीसंदर्भात जनजागृती हवी
आगीसारख्या दुर्घटनांतून धडा घेऊन शाळा, कॉलेजमधून अग्नीशमन दलातील व्यक्तींची व्याख्याने ठेवावीत. आपत्कालिन परिस्थितीतून मार्ग कसा काढावा याबद्दल जनजागृती करावी. विद्यार्थ्यांना आगींसदर्भातील ज्ञान द्यावे. मॉकड्रील दाखवावे. यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टींमधूनही मोठी दुर्घटना टाळता येतील, अशी माहिती अग्नीशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली.
पन्नास टक्के शाळांचे फायर ऑडिट पूर्ण
नगर शहरातील शाळा सुरू होत असून, सी. बी. एस. सी. पॅटर्नच्या सर्व शाळांनी तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व शाळांनी आणि 50 टक्के खासगी शाळांनी फायर ऑडिट करून घेतले असून, उर्वरित शाळांनी फायर ऑडिट करून घेऊन अग्नीशमन दलाने सुचविलेल्या सूचना तातडीने अमलात आणाव्यात. म्हणजे कोणत्याही दुर्घटनेला निमंत्रण मिळणार नाही, अशी अपेक्षाही शंकर मिसाळ यांनी व्यक्त केली.