नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने शुक्रवारी आसामचे मंत्री आणि भाजपचे वजनदार नेते हिमंता बिस्वा सर्मा यांच्यावर 48 तासांची प्रचारबंदी घातली. बोडोलॅंड पिपल्स फ्रंटचे (बीपीएफ) प्रमुख हग्रामा मोहिलारी यांना धमकावणारे वक्तव्य केल्याबद्दल ती कारवाई करण्यात आली.
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. अशात एका सभेत बोलताना सर्मा यांनी मोहिलारी यांना लक्ष्य केले. मोहिलारी यांनी जहालवादाचा मार्ग अवलंबल्यास त्यांना तुरूंगात जावे लागेल. ती कारवाई राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करेल, असे सर्मा यांनी म्हटले. त्या वक्तव्यावर आक्षेप घेत कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन आयोगाने सर्मा यांना प्रचार करण्यास मनाई केली.
आसाममध्ये सत्तेवर असणाऱ्या भाजपबरोबरची मैत्री बीपीएफने निवडणुकीआधी तोडली. तो पक्ष आता कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या महाआघाडीचा घटक बनला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने मित्रपक्षाच्या प्रमुखासाठी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर आयोगाने सर्मा यांच्या वक्तव्याविषयीचा अहवाल मागवला.
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यातील दोन टप्प्यांसाठीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.