भात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -सीमेवरच्या भाऊराया, तुझप्रती वेडी माया…अशा भावभावनांचा धागा मनी गुंफत पुण्यातील दिव्यांग मुला-मुलींनी स्वतः राख्या तयार करून त्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठविल्या. यावेळी निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी उपस्थित होते.
“आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील सैनिकांसाठी दिव्यांगांनी बनवलेल्या राख्या आणि चॉकलेट राख्या रवाना करण्यात आल्या. राख्यांचे पूजन दृष्टीहिन मुले आणि ब्रिगेडियर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विद्या गायकवाड, प्रशांत टिळेकर, अर्पिता चंडेल, हेमंत जाधव, डॉ.स्वप्नील शेठ, अखिल झांजले, संतोष फुटक, सुभाष सुर्वे, विक्रम मूर्ती, रामदास लढे आदी उपस्थित होते.
सीमेवरील सैनिकांसाठी पोस्टाने राखी येते. हा त्यांच्यासाठी भावनास्पर्शी प्रसंग असतो. त्यावेळी सैनिक आणि भारतवासियांचे एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त होते. आपल्या मागे आपला संपूर्ण देश उभा आहे, ही भावना सैनिकांपर्यंत राखीच्या माध्यमातून पोहोचणे गरजेचे आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर जोशी यांनी यावेळी व्यक्त केले.
जवानांसाठी स्फूर्तीदायक
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेथे पोस्टिंग होईल, त्याठिकाणी भारतीय सैनिक देशाच्या सीमांचे रक्षण करत असतात. प्रत्येक सैनिकाला स्वत:च्या अपेक्षेप्रमाणे हवे तेव्हा, आपल्या घरी जाता येतेच असे नाही. त्यावेळी त्याला घरून किंवा देशवासियांकडून राखी आली तर, त्याची स्फूर्ती वाढते. राखी पौर्णिमा हा सण जवानांचे मनोबल वाढवणारा सण आहे, असे ब्रिगेडियर जोशी म्हणाले.