नवी दिल्ली – दिल्लीत आंदोलनाला बसलेले शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत शेतकरी आंदोलनाच्या माध्यमांतील बातम्याही कमी झाल्या आहेत. तसेच सरकारने चर्चेच्या संदर्भातही कोणती वाच्यता केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत अस्वस्थ झाले आहेत.
सरकारच्या या शांततेचा एकच अर्थ निघतो की सरकार आंदोलनाच्या विरोधात काहीतरी मोठी तयारी करण्यात गुंतले असावे असे नमूद करून टिकैत यांनी सांगितले की नव्याने बोलणी सुरू करायची असेल तर त्याचा पुढाकारही सरकारलाच घ्यावा लागेल. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की गेल्या पंधरा वीस दिवसांतील सरकारची शांतता पाहता काहीतरी होणार असे संकेत मिळत आहेत. सरकार कोणतीतरी पावले उचलण्याची रूपरेषा तयार करते आहे. मात्र त्याचवेळी जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरीही माघार घेणार नाहीत. शेतकरी शेतीही करतील आणि आंदोलनही करतील. 24 मार्च रोजी देशांत अनेक ठिकाणी महापंचायत आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.