मुंबई – घोडेबाजाराला खतपाणी घालण्याची भाजपची परंपरा आहे. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून राज्यसभेसाठी जाणीवपूर्वक सातवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. घोडेबाजार करुन आमदार फुटतील असा भाजपचा प्रयत्न असल्याचे महेश तपासे म्हणाले.
महाविकास आघाडीला समर्थन देणारे घटक पक्ष आणि अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. जेव्हा राज्यसभेचे मतदान होईल त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असेल आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आलेले असतील, असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला.