मुंबई : राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे, आपलाच नेता निवडून यावा यासाठी सर्व पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. १०० टक्के आत्मविश्वास आहे, आमच्या मनात अजिबात धाकधूक नसल्याचे अनिल बोंडे यांनी विधीमंडळ परिसरात म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या एका नेत्यांविषयी सूचक वक्तव्य केले आहे.
महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की आहे असंही विधान यावेळी त्यांनी केलं. अनिल बोंडे यांना यावेळी संजय राऊत जाणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणता अश्वत्थामा गेला होता हेदेखील धर्मराजाने सांगितलं नव्हतं. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल”.
महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार आहे. ५.३० वाजता कोणता ते कळेल असं सूचक विधान त्यांनी केलं. संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहूयात असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच भाजपाचे तिन्ही उमेदवार १०० टक्के विजयी होणार. कारण देवेंद्र फडणवीसांचा धाक आहे असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल बोंडे यांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा सुरु आहे.