भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये संसदेला अतिशय महत्त्व असल्याने या संसदेचे दोन अविभाज्य घटक असणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहांच्या निवडणुकांनाही महत्त्व दिले जाते. अर्थात, मतदार प्रत्यक्षपणे मतदान करून लोकसभेत सदस्य पाठवतात. मात्र राज्यसभेत जे सदस्य जातात त्यांची निवडणूक वेगळ्या प्रकारची असली, तरी गेल्या काही वर्षांमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीलाही राजकारणाचे वलय प्राप्त झाले आहे. या राजकारणाच्या वलयाचा सर्वोच्च अंक सध्या सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्र पातळीवर असो किंवा देशपातळीवर असो लवकरच होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे आणि राज्यसभेतील आपले वजन वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थात, सत्ताधारी भाजपाला राज्यसभेतील आपले संख्याबळ वाढविणे महत्त्वाचे वाटत आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांनाही राज्यसभेमध्ये आपले संख्याबळ जास्त असावे, असे वाटत आहे आणि त्या दिशेने पावले टाकली जात आहेत. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार असल्याने आणि या निवडणुकीमध्ये राज्यसभेतील सदस्यांची मते अतिशय महत्त्वाची ठरणार असल्याने यावेळी राज्यसभेच्या या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यसभेत सध्या एकूण 245 सदस्य आहेत त्यापैकी 95 जागांसाठी येत्या काही महिन्यांमध्ये निवडणूक होणार आहे. अर्थात त्यापैकी सर्वाधिक 57 जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. या 57 जागांमध्येच महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. या 6 जागांच्या निमित्तानेच महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे.
विधिमंडळातून या राज्यसभा सदस्यांची पाठवणी राज्यसभेत केली जाणार असल्याने विधानसभेतील संख्याबळ महत्त्वाचे मानण्यात येणार आहे. ते संख्याबळ पाहता महाराष्ट्रातील 6 पैकी 2 जागा भाजप हमखास जिंकणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी 1 जागा जिंकू शकतात; पण सहावी जागा कोण जिंकणार याबाबत सर्वात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही सहावी जागा आपल्याला द्यावी आणि सर्वांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती; पण या विषयावरच आता राजकारण सुरू झाले आहे.
मुळात संभाजीराजे यांनी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत सदस्यत्व मिळवले होते आणि आता पुनर्निवडीचा विषय समोर आला आहे तेव्हा त्यांनी भाजपशी संपर्क साधलेला नाही. शिवसेनेनेही त्यांची जादा मते वापरून संभाजीराजे यांना निवडून देण्याचा विषय सुरू केला होता; पण जेव्हा संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला तेव्हा शिवसेनेने कोल्हापुरातील संजय पवार या शिवसैनिकाला राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याची घोषणा केली आहे. या घडामोडी घडत असल्याने भाजपनेही आता आपली तिसरी जागा जिंकून येऊ शकते का, या दृष्टिकोनातून प्रयत्न आणि चाचपणी सुरू केली आहे.
संभाजीराजे जर अपक्ष म्हणून उभे राहिले तर त्यांना पाठिंबा देण्याबाबतही विचार भाजपने सुरू केला आहे. अर्थात केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवरसुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीला महत्त्व आहे. कारण सध्या राज्यसभेच्या 245 पैकी भाजपचे फक्त 95 खासदार आहेत. म्हणजेच केंद्रात गेले आठ वर्षे सत्तेवर असूनही राज्यसभेत अद्यापही भाजपाला बहुमत मिळवता आलेले नाही. आता जे सदस्य निवृत्त झाले आहेत त्याजागी ही निवडणूक घ्यावी लागत आहे. त्यापैकी काही ठिकाणी भाजपला विजय मिळण्याची शक्यता कमी असल्याने यावेळी भाजप सदस्यांची संख्या कमी होण्याची शक्यता जास्त आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी राज्यसभेतील सदस्य संख्या महत्त्वाची असल्यानेच या निवडणुकीच्या राजकारणाला महत्त्व देण्यात येत आहे. राष्ट्रपतिपदासाठी असलेल्या मतदारसंघाचे संख्याबळ व स्वरूप पाहिले, तर सत्ताधारी भाजप आघाडीकडे साधारण 49 टक्के मते आहेत, तर कॉंग्रेस आणि विरोधी आघाडीकडे 51 टक्क्यांच्या आसपास मते आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजपाला प्रचंड प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार आहे.
दुसरीकडे या निवडणुकीमध्ये भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनीही कंबर कसली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी भाजपच्या विरोधात विरोधकांची एकजूट बांधण्यासाठी कंबर कसली असून विविध राज्यांतील विरोधी पक्षांच्या अनेक मुख्यमंत्र्यांशी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. अर्थात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार कोण असेल यावरसुद्धा अनेक वेळा सर्व काही ठरते. जेव्हा प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती झाल्या होत्या तेव्हा त्यांना शिवसेनेने महाराष्ट्रकन्या म्हणून पाठिंबा जाहीर केला होता. साहजिकच भाजप आघाडीतर्फे कोणत्या उमेदवाराची घोषणा केली जाते आणि विरोधी आघाडीतर्फे कोणाला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाहीर केले जाते हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या तरी या निवडणुकीसाठी महत्त्वाचे असणारे राज्यसभेतील आपले संख्याबळ वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर छत्रपती संभाजीराजे यांची या निवडणुकीतील एन्ट्री हाच एक उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. संभाजीराजे यांना कोणत्याही एका राजकीय पक्षाची बांधिलकी नको असल्याने त्यांनी कोणत्याच राजकीय पक्षाकडे मदत मागितलेली नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवतानाच इतर कोणत्या राजकीय पक्षाने त्यांची अतिरिक्त मते आपल्याला दिली तर ती त्यांना हवी आहेत आणि याच एका आशेवर आणि अपेक्षेवर त्यांनी या निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे.
राज्यातील राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा मराठा समाजाच्या विविध समस्यांबाबत पुढाकार घेणाऱ्या नेत्यांचा विषय असो, त्यामध्ये संभाजीराजे यांचे नाव नेहमीच पुढे असल्याने कोणत्याच राजकीय पक्षाला संभाजीराजे यांना नाराज करणे परवडणार नाही. त्यामुळेच येत्या काही दिवसांमध्ये अजूनही काही घडामोडी घडू शकतात. निश्चितच आतापर्यंत कधीच राज्यसभेची ही निवडणूक अशाप्रकारे औत्सुक्याची आणि चुरशीची झाली नव्हती. सर्वसाधारणपणे बिनविरोध पद्धतीनेच राज्यसभेवर सदस्यांना पाठवण्याची परंपरा पाळली जाते; पण या वेळी प्रथमच राजकीय पक्षांना आपले अस्तित्व दाखवायचे असल्यानेच राज्यसभेची ही निवडणूकही चुरशीची ठरत आहे.